गाथा बलिदानाची

कोंडाजी फर्जंद

बेखौफ छत्रपतींचा दिलफेक योद्धा…!

सन १६८१ , स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजीराजा सिंहासनाधिष्ट होत नाही तोच हंबीररावांनी बुरहानपूर मारले. ती तारीख होती ३० जानेवारी १६८१
आणि सोबतच राजांनी सिद्दीची कुंडली हाती घेतली होती. उंदेरीच्या जलकोटावर एक जबरदस्त हल्ला चढवला होता. पण एवढ्यातच एक वार्ता उठली.

“कोंडाजी दुष्मनास सामिल झाला” दगाबाज झाला” स्वराज्याची निष्ठा सोडून गनिमाच्या- सिद्दीच्या चाकरीत दाखल झाला !

बुलंद दुर्गास अगदि आतूनच सुरूंग लागावा तशी ही घटना.
शिवकाळातच कोंडाजी हा नाव मिळवून होता. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजापूरकर इंग्रज काही तोफा घेऊन पैशाच्या अमिषाने सिद्दी जोहरच्या वेढ्यात सामिल झाले होते.
यावेळी कोंडाजीने मोठ्या बेमालूमपणे इंग्रजांचा वेश धारण करून सिद्दी जोहरच्या तोफा निकामी केल्या होत्या. पुढे पन्हाळगड जिंकण्यास त्याने प्राणाची बाजी लावून अवघ्या ६० मावळ्यांसह पन्हाळगड एका रात्रीत सर केला होता. असा हा वीर !
सिद्दीचे आश्रयस्थान ते जंजीरा. तसे जलदुर्ग कुठलाही असो तो पाण्याने सुरक्षित असतोच. शिवाय त्याजवळ पोचण्याच्या प्रयत्नात असलेल गलबत मोठ्या सहजतेने त्या जल दुर्गावरील तोफांच्या भक्षस्थानी पडत असे. अशाप्रकारे प्रत्येकच जलदुर्ग हा अभेद्य ठरत असे.
म्हणूनच सन १६८२ मध्ये, सिद्दीला त्याच्या वारूळातच गाठून माराव असे योजून संभाजीराजांनी सिद्दीकडून जंजिरा जिंकण्यासाठी एका कूटनितीचा अवलंब केला. आणि यासाठी निवड करण्यात आली ती कोंडाजी फर्जंद या योद्ध्याची !
ठरल्या मसलती प्रमाणे कोंडाजीं राजांची चाकरी सोडून सिद्दीस सामील झाला होता. सिद्द्यानेही या योद्ध्याचे मोठे आगत स्वागत केले.
एवढेच नाहीतर सिद्दीच्या ऐषारामी- रंगेल रंगात बेमालूमपणे रंगून कोंडाजीने एक बटीकही खरेदी केली. मात्र खोल काळजाच्या त्या कप्प्यात स्वराज्याचा मानस शाबूत होता. अभेद्य जंजीऱ्याच्या दारूकोठारास आग लाऊन तो भस्म करण्याचा तो बेत त्याच्या बुद्धीत आकारास येऊ लागला होता. सापाच्या वारूळात शिरून ते उध्वस्त करण्याचा हा बेत म्हणजे प्राणचीच बाजी.

जंजीऱ्याच्या महालात कोंडाजी आपल्या सहकाऱ्यांसह राहू लागले. सिद्दीच्या गळ्यातील ताईत झाले.
आणि एका ठरल्या दिवशी किल्ल्यामधील दारू कोठारास आग लावून एकच भडका उडवून द्यायचा तो बेत आता पूर्णत्वास जावयास आतूर होता. कोंडाजीचे सहकारी कामाला लागले. दूर रायगडाच्या दरबारी मुजरे स्विकारीत असलेला राजाही मधूनच हरवून सागर दिशेने नजर लावून बघत होता.
आता कोंडाजीही सहकाऱ्यांसह सिद्द झाला होता. आणि विश्वासाधिन असलेल्या आपल्या त्या बटिकेस त्यांनी तो बेत सांगीतला. तेव्हा तिनेही सोबत येण्याची तयारी चालवली. मात्र तिच्या या घाईची कहानी तिच्या दासीला समजली. आणि तिने थेट सिद्दीला गाठले, आणि अचानक घातच झाला..!
ती दासी काझी महमद तालकर याची स्त्री होती. तिच्याकरवीच सिद्दीस सर्व माहिती मिळाली व लगेच त्याने कोंडाजी आणि मंडळीस कैद करण्याचा हबश्यांना हुकूम दिला. कोंडाजीसह साऱ्यांची धरपकड झाली.
सिद्दी तसा क्रूरकर्माच ! त्याने लगेच हुकुम फर्मावला आणि …कोंडाजींचा शिरच्छेद करण्यात आला. सोबतींपैकी काहींना जल समाधी देण्यात आली तर धांदलात कुणी पळोन गेले. तटावरून उडी मारून खडकावर आदळून जाया झाले. स्वराज्याच्या आसमंतातील एक तारा निखळला होता… स्वराज्याच्या दुर्गाचा बुलंद बुरूजच ढासळला होता.
कोंडाजींचे वर्तमान संभाजीराजांना कळताच त्यांनी पुढचे एक धाडसी पाउल उचलले. एवढ्या दिवसापासून रचलेला एक धाडसी प्रयत्न फसला होता, आता मोहिमेची सूत्रे संभाजीराजांनी आपल्या हातात घेऊन जंजीऱ्याच्या दिशेने कूच केले.
संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून सिद्दीला जेर केले. या संबधी मुंबईकरांनी सुरातकरांना १९ जाने १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे त्या मधील नोंदीनुसार –

‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’.
काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजि-या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून संभाजी राजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय घेतला! हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते, इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून

पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार ? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले.
याच दरम्यान खासा औरंगजेब संपूर्ण ताकदीने दख्खनेत उतरला होता. फेब्रु १६८२ च्या सुमारास त्याने बुरहाणपूर सोडले. त्याच वेळी औरंगजेबाचा सरदार हसन अली याने आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आणि कल्याण भिवंडी जाळून भस्म केले याची नोंद जेधे शकावली मधे मिळते – ‘शके १६०३ माघमासी हसनअली कल्याण भिवंडी जाळोन फिरोन गेला.
औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले. खासा दिल्लीपतीच महाराष्ट्रात आल्यामुळे संभाजीराजांसमोर मोठे आव्हान समोर उभे होते, त्यामुळे दादाजी रघुनाथ यांच्याकडे मोहिमेची सूत्रे देऊन संभाजीराजे खानाच्या समाचारास परतले ! असा हा धाडसी राजा व असे त्याचे धाडसी योद्धे ! पण संभाजीराजांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथमवीर ठरला !
आज मात्र या जंजिऱ्यात जो इतिहास सांगितला जातो त्यात या महावीराचे नाव कुठेच घेतले जात नाही. जंजिरा अजिंक्य म्हणून फुशारकी मारणारे सिद्यायचे वंशज खोटा इतिहास सांगत फिरतात.
मात्र आजही जाऊन जंजीऱ्याच्या त्या अभेद्य तटबंदीच्या पाषाणास विचारा-
ते ही सांगतील की,
आम्ही उरलो ते सिद्दीची जुल्मी सत्ता सांगावयास वा पिडित रयतेचे हाल बोलावयास नव्हे !!!
तर उरलो आम्ही तुम्हा सांगावयास बेखौफ उमद्या छत्रपतीची चाल तूफानी व तयासाठी जान कुर्बान करणाऱ्या दिलफेक योद्ध्याची ही अमर काहानी !
कारण उरात दडलेल्या या शौर्य कथा, थंड पाण्यातील ज्वलंत व्यथा, ज्या सागराशी झुंजावयाचे धाडस
आजही देतात आम्हांस , सदैवच !!!