याचे कारण इतकेच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येते की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत?
अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिला आहे, जो प्रत्येक पालकाने वाचला पाहिजे.
त्यांनी लिहिले-
गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पुढील दोन महिने त्यांच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजेच तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल.
– मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असे सांगा.
– जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल.
– त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या.
– तीन शेजाऱ्यांच्या घरी जा. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि जवळ व्हा.
– आजी-आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा.
– त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल.
– कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका.
– किचन गार्डन तयार करण्यासाठी तुमच्या मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
– मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा.
– तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होऊ द्या, त्यांना घाण होऊ द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे त्यांच्यासाठी चांगले आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल.
– त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या.
– त्यांना काही लोकगीते वाजवा.
– तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके आणा.
– तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा. या सगळ्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे.
– त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, एरेटेड पेये आणि बेकरी उत्पादने जसे पफ आणि तळलेले पदार्थ जसे समोसे देणे टाळा.
– तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत, ते नवीन उंचीवर असतील.
पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुले खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टींपासून दूर आहेत, ज्यामुळे आपण स्वतः आनंदी आहोत… चला यंदा सुट्टीचा सदुपयोग करूया!
आता सुटी सुरू होणार. म्हणजे शाळेतल्या अभ्यासाला सुटी आणि धमधमाल, मस्तममस्ती करत शोधाशोधीच्या गृहपाठाला सुरुवात.
हा सुटीतला गृहपाठ घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचा आहे. घरातले सगळे म्हणजे, आई, बाबा, भाऊ, बहिणी, गुगल काकू, गुगलबाबा आणि घरातील सगळ्यांचा आवडता नातेवाईक ‘स्मार्ट फोन’ यांचा सगळ्यांचा मुक्त सहभाग हवा. आपल्या कुटुंबात नव्यानेच येत असलेले ‘श्री. चॅट जिपिटी आणि त्यांचे नातेवाईक एआय’ यांची पण मदत बिनधास्त घ्या.
हा ‘गृहपाठ’ नवीन शोधण्याचा, हसण्याचा, मस्तीचा, मजेचा आणि इतकंच काय तर काहीवेळा खतरनाक निरर्थक पण आहे!
आणि हो.. यातील काही गोष्टी तुम्ही केल्यावर, शोधल्यावर, लिहिल्यावर आम्हाला जरुर कळवा आणि तुमच्या मस्तामस्ती मजामजीत आम्हाला ही सहभागी करुन घ्या.
01. तुमच्या घरात सिलिंग फॅन तर आहेच. तो घड्याळ्याचा दिशेने फिरतो की विरुध्द दिशेने? हे तुम्ही कसं शोधाल? सिलींग फॅन आणि टेबल फॅन एकाच दिशेने फिरतात की वेगवेगळ्या? का? दोघांच्या रचनेत मूलभूत फरक काय आहे? काढा शोधून. करा प्रयोग.
02. स्वयंपाक करताना तेल तापलं आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोहरीच का घालतात? जिरं का घालत नाहीत? मला खात्री आहे याचं उत्तर घरातील ज्येष्ठ गुगलकाकू सांगू शकतील.
03. तुम्हाला घरातील इंटीरीयर पूर्णपणे बदलायचं आहे. अगदी वाट्टेल तस्सं बदलायचं आहे.. म्हणजे स्वयंपाक घरात वॉशिंग मशीन ठेवायला आणि मिक्सर बेडरुममधे ठेवायला पूर्ण परावानगी आहे.. पण हे सर्व फक्त कागदावरच! त्यासाठी घरातील सगळ्या वस्तूंची मापं काढा. लांबी, रुंदी आणि ऊंची. मग घराचा नकाशा. आणि आता या घरातल्या नकाशावर ठेवा तुमच्या वस्तू तुम्हाला हव्या तिथे. खोली मोठी करायची असेल तर कागदावरच्या भिंती सरकवायला किंवा पाडायला परवानगी आहे. हे तुमचे इनोव्हेटिव्ली रिनोव्हेटेड घर पाहायला आम्हाला आवडेल.
04. 13 सुंदर निरर्थक वाक्यांची एक मस्त निरर्थक गोष्ट तयार करा. म्हणजे वाक्यांना काडीमात्र अर्थ नको पण गोष्ट मात्र ‘मस्त निरर्थक’ असावी. करा सुरुवात.
05. प्राणी आणि पक्षी यांच्या तुम्हाला माहित नसलेल्या किमान 39 गोष्टी शोधा. शक्य असल्यास आम्हालाही कळवा. (उदा. मुंगीला दिसत नाही. डासाला सोंड असते. माशीला 2000 डोळे असतात.)
06. दिवसभरात तुम्ही किती वेगवेगळे आकार वापरता याची किमान ती दिवस नोंद ठेवा. (उदा. गोल, चौकोन, आयत, शंकू, पट्टी, गोल-आयत, लंबगोल-पट्टी इ.)
07. 26 नवीन उपमा शोधा. कृपया यासाठी ‘गुगुल परीवारातील’ कुणाची मदत घेऊ नका ते हॅंग होतील. अपना दिमाद लगाओ और हमे बताओ. (उदा. दहीभात म्हणजे हिमालय. निळा नाइट लॅम्प म्हणजे निळी पणती.इ)
08. सायकल चालवता येत नसेल तर ती शिका. सायकल येत असेल तर, गावातल्या किमान 13 अनोळखी रस्त्यांवरून फेरफटका मारा. नवीन रस्ते शोधा. गावाची, शहराची ओळख करून घ्या. सर्वांनी मिळून ‘सायकल ट्रिप’ काढा. आम्हालाही कळवा.
09. हिंगाची डबी उघडल्यावर येणार्या वासाचं नाव काय? जीरं हातावर भरडल्यावर येणार्या वासाचं नाव काय? ग्लुकोज बिस्किट आणि मोनॅको बिस्किट या दोघांचा वास वेगळा आहे? अशा वेगवेगळ्या 26 वासांची नवीन नावं तयार करा. (उदा. ताज्या गुळाचा गोडगिट्ट वास. गुळाच्या पाकाचा गुळमट वास.)
10. तुम्हाला किती रंगांची नावं माहित आहेत? आमच्या इयत्ता तिसरीतल्या मुलांनी 91 रंगांची यादी तयार केली. उदा. पांढर्या काचेचा रंग पाण्यासारखा असतो, म्हणजे पाणी कलर. शेजवान कलर. ओरिओ कलर. काळपट हिरवा, निळसर गुलाबी. इ. नवीन रंगांची किमान 39 नावे शोधाच.
11. तुम्ही सगळे खवय्ये आहातच. इडली सोबत मिळणारी लाल चटणी, हिरव्या मिरचीची डाळं घातलेली चटणी आणि गनपावडर चटणी चवीला वेगवेगळीच. म्हणजे कशी हो? वेगवेगळ्या चटण्या, पाणीपुरीचं पाणी, जिलबी, मसालेभात, बिर्याणी उफ्! अशा किमान 117 गोष्टी आपण चवीचवीने खात असतो, त्यापैकी फक्त 39 पदार्थ आणि त्यांच्या चवीचे नाव सांगा बरं. (उदा. दुधाळ कॉफी. लसणीची चरचरीत फोडणी. हिंगुट वास पुढे आल्याने चिवडा समसमीत झालाय)
12. आता इतक्या पदार्थांची उजळणी केल्यावर जीभ खवळणार! भूक कडाडणार. मग खूप खाल्लं तर पोट बिघडणार. भूक लागल्यावर आणि खाऊन खाऊन पोट बिघडल्यावर, तुम्ही तुमची अवस्था सांगण्यासाठी जर वेगवेगळे 39 शब्द वापरत असाल तर तुम्ही खरे खवय्ये! (उदा पोटात कळमळतंय. कावळे ओरडत आहेत. पोट घुसघुसतंय. इ) आणि हो, तुमच्याकडे 39 पेक्षा जास्त शब्द असतील तरच आम्हाला कळवा.
13. या सुटीत कणिक मळायला शिकाच म्हणजे ‘मळणे’ याचा खरा अर्थ तुम्हाला अनुभवता येईल. तीन ते चार दिवसांच्या अथक सरावानंतर कणिक व्यवस्थित मळता येईल पण तोपर्यंत ‘कपडे मळणार नाहीत’ याची काळजी घ्या.
14. घरामधील वेगवेगळ्या वस्तूंमधील अंतर मोजण्यासाठी वेगवगेळी 26 परिमाणं वापरा. त्याचा एक चार्ट तयार करा. (उदा अंतर मोजण्यासाठी, पट्टी, काठी, ओढणी, रुमाल, घरातल्या सगळ्यांची पावलं, चमचे अशा गोष्टींचा उपयोग करा.) हे काम घरातल्या सगळ्यांनी मिळून करायचं आहे.
15. तुम्हाला ‘म’ ची भाषा माहित आहे का? उदा. तुमम्हाला ममची भामषा मामहित आमहे काम? आता तुम्ही तुमची नवीन सांकेतिक भाषा तयार करा. आणि चक्क दिवसभर सगळ्यांशी याच भाषेत बोला पण त्यावेळी इतरांचा होणारा गोंधळ समजून घ्या.
16. सर्वांच्या घरात किमान 117 काटकोन असतातच. तुमच्या घरात किती आहेत? मोजा. तुम्हाला तुमच्या घरातच लपलेले 169 काटकोन सहजच मिळतील.
17. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 13 मिनिटं खिडकीत उभे राहा. 13 मिनिटांपैकी 9 मिनिटं डोळे बंद ठेवा. ऐकू येणारे आवाज लक्षात ठेवा. 13 मिनिटात शक्यतो 27 आवाज ऐकू येतात. तुम्हाला किती ऐकू आले? ते लिहा. असं किमान तीन वेळा करा. नंतर खिडकीत जाण्याआधीच तुम्ही आवाजाचा वेध घेऊ शकाल.
18. आज दिवसभर बोलताना घरातल्या सर्वांनी ‘यमकोगिरी’ करायची आहे. काही बोलताना ‘यमक’ वापरायचं.. अर्थपूर्ण किंवा निरर्थक.. पण यमक हवेच! घरात होणारी दे धमाल अनुभवा. (उदा. आई मला पोळी, ती पण पुरणाची पोळी. पोळीवर तूप, खूप खूप)
19. आकाश कुठे संपतं आणि अंतरीक्ष कुठून सुरु होतं? हे शोधून काढा.
20. ससा का चालत नाही आणि झुरळ का मागे वळत नाही? हे शोधून काढा.
21. ‘दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो’ असं तुम्ही ऐकलं असेल. पण आपल्या काश्मिरमधे दुपारी 12 वाजता सूर्य डोक्यावर येतच नाही. तिथे सूर्य डोक्यावर कधी येत असेल की येतच नसेल? तुम्हाला काय वाटतं?
22. कणिक, रवा आणि मैदा हे गव्हापासूनच तयार करतात. तर या तिघांचे गुणधर्म एकच आहेत की वेगवेगळे? का? चला शोधा.
23. एक दिवस घरातला शिवणाचा डबा घेऊन ‘शिवाशिवी’ करा. बटण लावणे, हुक लावणे, शिवणे, टीप किंवा धावदोरा घालणे, टाका घालणे याचा अनुभव मोठ्या माणसांसोबत घ्या.
24. या सुटीत वेगवेगळ्या फळांच्या बिया जिथून मिळतील तिथून जमवा. साफ करुन ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बीया डोंगरावर, बागेत किंवा रस्त्याच्या बाजूला रुजवण्याचा प्रयत्न करा.
25. आपल्या परिसरात अंध, अपंग, कर्णबधिर, गतिमंद अशी काही खास मुले असतात. सुटीच्या दिवसातील काही दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांना बागेत फिरायला घेऊन जा. त्यांच्याशी खेळा. तुमच्या मदतीची नाही तर तुमच्या मैत्रीची त्यांना गरज आहे, हे लक्षात ठेवा. मला खात्री आहे त्यांच्या सहवासात तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतील.
26. ‘आई’ या शब्दासाठी किमान 39 भाषेतले शब्द शोधा. पाहून लिहा. यासाठी घरातल्यांची, शेजार्यांची तसेच गुगलबाबा, चॅटजिपीटी यांची मदत घ्या.
27. आता तुम्हाला वेगळ्या भाषेतले समानार्थी शब्द शोधण्याचा चांगला सराव झालाच आहे. आता तुम्ही तुमचे स्वत:चे नाव वेगवेगळ्या 13 भाषांत कसे लिहितात ते शोधा आणि पाहून लिहा. मग ते मित्र मैत्रिणिंना दाखवा.
28. प्रत्येक फळ कापण्याची पध्दत वेगळी असते आणि ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. या सुटीत आंबा, कलींगड, पपनस, टरबूज, पपई, फणस, अननस अशी फळे वेगवेगळ्या पध्दतीने आवर्जून कापा आणि ‘कापण्यातली गोडी’ अनुभवा.
29. दूध गरम करणे, उकळणे, आटवणे, नासवणे, अती थंड करणे, विरजणे, पावडर करणे यांचे खूप फायदे आहेत ते कोणते? दूध वापरुन केलेल्या पदार्थाची एक रेसिपी सांगा पाहू.
30. हे वेगवेगळे 13 पदार्थ कशा-कशापासून तयार होतात : डोसा, इमरुती, केक, सोलकढी, उंधियो, सुतरफेणी, पेठा, बकलावा, संदेश, पास्ता, जॅम, बटरस्कॉच आईसक्रिम, मणगणे.
31. आईच्या आणि बाबांच्या मदतीने “आमच्या खास रेसीपी” असे तुमच्या कुटुंबाचे चमचमीत रेसिपी पुस्तक तयार करा. या पुस्तकातील पदार्थांचे फोटो, रेसीपी आणि पदार्थांची वर्णनं अशी लिहा की शेजार्यांच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. मग फोटो अपलोड करून त्याचे इ-बुक करा. ते सगळ्यांना सेंड करा. वाचणार्यांच्या जीभा खवळल्या पाहिजेत.
32. सेल्फी काढा पाच बोटांनी : एखाद्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर घरातल्या आरशासमोर खुर्ची घेऊन बसा. थोडावेळ निवांतपणे स्वत:ला पाहा. स्वत:कडे पाहा. मग आरशात पाहून स्वत:चेच मस्त चित्र काढा. चित्राखाली नाव न लिहिता ‘चित्रातील व्यक्ती’ तुमच्या घरातल्यांना, शेजारच्यांना किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींना ओळखता येते का पाहा.
33. घराजवळील किराणामालाचे दुकान, औषधाचे दुकान, दवाखाना, डेअरी अशा कुठल्याही ठिकाणी दिवसांतून एक तास मदत करण्यासाठी जाता येईल. यासाठी घरातील मोठ्या माणसांच्या मदतीने प्रयत्न करा. खूप वेगळं पाहण्याचा आणि शिकण्याचा जाणीवपूर्वक अनुभव घ्याच.
34. आठवड्यातून एक दिवस किमान एक वेळ तरी आईसोबत स्वयंपाक घरात काम करायचेच आहे. मग होणार्या गमती आम्हाला कळवायच्या आहेत.
35. रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचाच वापर करा. सुशोभन करण्याच्या विविध पध्दती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही एक चित्र काढा / आकृती काढा / ठिपक्यांची रांगोळी काढा व त्यात रंग न भरता त्यात टाकाऊ वस्तूंचा उपयोग करा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, सुक्या फुलांचा चुरा, गवत, बीया, रंगीबेरंगी चिंध्या, शेंगांची टरफले, प्लास्टीकचे तुकडे, चहाचा चोथा इ. हे फोटो आम्हाला इ-मेलने पाठवा.
36. विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक पुस्तके आता बाजारात किंवा वाचनालयात उपलब्ध आहेत. ती मिळवा. किंवा नेटवर www.arvindguptatoys.com ही साइट पाहा. इथे विज्ञानाचे हजारो प्रयोग आहेत. हे सोपे प्रयोग स्वत:हून करा. त्यातील मजा अनुभवा.
37. ज्या दुकानात पंखा, इस्त्री, मिक्सर दुरुस्त करतात अशा दुकानात जा. दुकानदाराच्या परवानगीने दुकानात सुरू असणार्या कामाचे ‘शांतपणे’ निरीक्षण करा. मग दुकानदाराच्या सोयीच्या वेळात त्यांची परवानगी घेऊन त्यांना प्रश्न विचारून नवीन गोष्टी शिकून घ्या.
38. तुमच्या जवळच्या मित्रांना एका संध्याकाळी घरी बोलवा. कुणी काय करायचे याचे नियोजन करुन, सर्वांनी मिळून चटकदार ओली भेळ करा आणि तुमच्या पालकांना खिलवा. ही ‘खिलवा खिलवी’ मग सर्वच मित्रांच्या घरी करा.
39. गाजर, काकडी, मुळा, टॉमेटो, बीट किंवा कोबी यांची कोशींबीर करणं तुम्हाला सहज जमू शकतं. आठवड्यातून दोनदा अवश्य करा. घरातलेच काय शेजारी पण आनंदाने खातील.
खरं म्हणजे तुम्हाला रोज एक गोष्ट करता यावी, असा विचार करून मी तुम्हाला 52 गोष्टी सांगणार होतो. पण मी अचानक विचार बदलला. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे, या जरी 39 गोष्टी असल्या तरी त्या काही रोज फक्त एकच करायच्या गोष्टी नाहीत. यासाठी नक्कीच तुम्हाला जास्ती दिवस लागतील. आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी मीच का सांगाव्यात? ‘तुम्ही सर्जनशील आहात’ यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आणखी भन्नाट गोष्टी शोधून काढा. नवनवीन गोष्टी करुन पाहा, शिका आणि एनजॉय करा… आणि हे सारं मला ही कळवा.
मी तुमच्या ‘सर्जनशील एनजॉयमेंट’ पत्रांची वाट पाहतोय.
……………………………………………………………………………..
– राजीव तांबे
– rajcopper@gmail.com
arvindguptatoys.com
ArvindGuptaToys Books Gallery
ArvindGuptaToys.com. Gallery of Books And Toys courtesy Arvind Gupta the Toy Maker. Have fun and learn through Toys and Books. Page by Samir Dhurde
कडक उन्हाळ्याच्या शेवटी आमच्या घराच्या, व्हिडियो डोअर फोनच्या वरती, एका बुलबुलने, नेटाने आजूबाजूच्या काड्या, जुने कापडाचे तुकडे वगैरे गोळा करून एक टुमदार घरटे बनवले होते. एकीकडॆ बेभान वारा, मधूनच येणारा मृदुगंध असे पावसाची चाहूल देणारे, मुग्ध करणारे वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे एक दिवस अचानक त्या टुमदार घरट्यातून पिल्लांचा किलकिलाट ऐकू लागला.
न राहवून, मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने घरट्यात डोकावून बघितले आणि अहाहा, नुकतीच जन्माला आलेली दोन सुंदर पिल्ले दिसली! पिल्लू कुणाचेही असो, दिसते मात्र गोडच!
जवळपास मिस्टर आणि मिसेस बुलबुल यांची पिल्लांना भरवणे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांचं हवं नको ते बघणे अशी लगबग सुरु होती.
साधारण दोन आठवड्याने मी दरवाजातून बाहेर पडताना सवयीने त्या घरट्याकडे बघितले आणि मला एकदम शांतता जाणवली. म्हणून पुन्हा एकदा घरट्यात डोकावून बघितले तर पिल्ले चक्क उडून गेली होती. मिस्टर आणि मिसेस बुलबुल पिल्लं जन्म देऊन केवळ दोन ते तीन आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले होते!
ते बघितल्यावर माझ्या डोक्यात काही विचार घोळू लागले. बुलबुलचे पालकत्व म्हणजे साधारण घरटे बांधणे, अंडी घालणे, ती उबवणे आणि काही दिवस पिल्लं सक्षम होईपर्यंत त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे, एवढे मर्यादित होते. त्यासाठी त्याला आणि तिला वर्षातून केवळ दोन महिने द्यायचे होते.
पिल्लांच्या संगोपनाचा असाच काळ, जर आपण चिमण्या, कावळे, गाई, हरणं, वाघ आणि हत्तींचा बघितला, तर तो वेगवेगळा असल्याचेमाझ्या लक्षात आले. मला असेही जाणवले की जे प्राणी एकटे किंवा जोडीने राहतात त्यांना निसर्गाने पालकत्वाची कमीत कमी जबाबदारी दिली आहे. त्यांची पिल्ले तुलनेने लवकर सक्षम होतात.
मात्र कळपात राहणारे, सामाजिक जीवन जगणारे जे प्राणी आहेत त्यांच्यात मात्र कळपाच्या संख्येप्रमाणे पिल्लांच्या संगोपनाचा कालावधी हा वाढत जातो. आपण माणसं देखील निसर्गतः: कळपात राहणारे, सामाजिक प्राणी आहोत. त्यामुळे आपल्या पिल्लांचा सक्षम होण्याचा कालावधी देखील थोडा किंबहुना बराच जास्त आहे.
मात्र निसर्गात जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर कळपात असलेल्या पण अजून सक्षम न झालेल्या पिल्लांची जबाबदारी कळप कधीच एकट्या आईवर, किंवा दुकट्या आई वडिलांवर टाकून मोकळा होत नाही. त्या पिल्लांची जबादारी संपूर्ण कळप घेतो. त्याचबरोबर पिल्ले सक्षम झाली की कळप त्या पिल्लांच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करत नाही, त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो.
जोपर्यत आपण “उत्तम आयुष्य” जगण्याच्या नावाखाली एकामागे एक “अनैसर्गिक व्यवस्था” उभ्या करण्याच्या मागे लागलो नव्हतो, तोपर्यंत माणसांच्या कळपाचे जगणे पण असेच होते. मात्र हळहळू या अनैर्सगिक सामाजिक व्यवस्थांचा माणसाच्या जीवनावर अत्यंत वेगाने भलाबुरा परिणाम होऊ लागला.
हा परिणाम म्हणून, आज बहुतेक कुटुंबे छोटी होत चालली आहेत, त्रिकोणी होत आहेत. आई वडील दोघेही नोकरी करत आहेत. घरांची दारे बंद राहत आहेत, मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने जास्तीत जास्त वेळ चार भिंतीच्या आत कोंबली जात आहेत.
माणसाच्या पिल्लांचे हे जग अनुभवण्यासाठी, त्यांनी वापरायच्या साधनांचे, पद्धतींचे, वेळेचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन, मोठी माणसे स्वतःची साधने, पद्धती, वेळापत्रक आणि जगाविषयीचे आकलन मुलांवर नकळतपणे लादत आहेत.
गंमत म्हणजे या सगळ्या परिस्थितीत, आपल्या पिल्लांचा आई, वडिलांवर, कळपावर अवलंबून राहण्याचा कालावधी मात्र कुठेच कमी झालेला नाही उलटा तो वाढतच चालला आहे आणि इथेच सगळी गोची झाली आहे.
मुलांची जबाबदारी ज्यांनी घायची ती माणसे स्वतःच्याच जबाबदारीत जास्तीत जास्त गुंतत चालली आहेत मुलांच्या आजूबाजूला मुलांवर “निरपेक्ष” प्रेम करणाऱ्या, निरपेक्षपणे एकत्र येऊन मायेची उब देणाऱ्या कळपातील माणसांची संख्या वेगाने कमी होत आहे. माणसांच्या कळपाने आता कळपातील पिल्लांची जबाबदारी घेण्याचा सुद्धा व्यवसाय करून टाकला आहे!
ज्या वयात फक्त उबदार स्पर्श हवा आहे, ऐकणारे कान हवे आहेत, गाणी गोष्टी सांगणारी माणसे हवी आहेत, त्या वयात “तासावर पैसे” घेणारी माणसे मुलांना जास्तीत जास्त वेळ “शांत” बसवून एक “भावनिकदृष्ट्या कुपोषित” पिढी घडवत आहेत!
यात पालकांचा दोष आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. पालकांवर देखील विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रचंड जबाबदारी येऊन पडली आहे. मात्र पालकांनी अशा परिस्थितीत स्वतःला “आयसोलेट” करणे, समाजापासून फटकून राहणे तडतोब कमी करण्याची गरज आहे.
आपल्याला आता जुनी वाडा संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती परत आणणे तर शक्य नाही. मात्र आपण एकत्र येऊन आपल्या मुलांना शक्य तितकी भावनिक सुरक्षितता, निरपेक्षपणे प्रेम करणाऱ्या माणसांचा सहवास, आजूबाजूचे चांगले जग, त्या जगात उद्दात्त आणि उमेदीने काम करणारी माणसाने, संस्था दाखवून मुलांच्या जगण्याचा उत्साह तर वाढवू शकतोच की!
अशा प्रकारच्या घुसळणीतून मुलांना या जगातील जे वैविध्य अनुभवता येईल त्यातून आपल्या पिल्लांना हळूहळू जगण्याचा अर्थ समजू लागेल. हे सगळं करण्यासाठी म्हणून आपल्याला पालकांचे छोटे छोटे “सामूहिक पालकत्व” या संकल्पनेवर काम करणारे गट हवेत.
आपली पिल्लं कधीतरी त्या बुलबुलाच्या पिल्लांसारखी उंच भरारी घेत उडून जाणारच आहेत पण ती उडून जाण्याआधी, पालकांचे हे गट या पिल्लांना जे अनुभव देणार आहेत, तेच अनुभव पुढील काळात वृद्धाश्रमांची संख्या कमी करणार आहेत, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही..
सारा आणि जुई नऊ वर्षांच्या एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन छोट्या मैत्रिणी, घराच्या मागच्या टेरेसवर भातुकली खेळत होत्या. सारा म्हणाली, “अग जुई माझी इतकी घाई आहे न किचनमध्ये लंच करायचंय . मग टिफीन पॅक करायचे. रौनकला शाळेत सोडायचंय .” आणि मुव्ह फास्ट असं ती स्वतःशीच बडबडली . जुई म्हणाली ,” सारा मला पण दुपारी सुरभीला स्कूलमधून आणायचंय . तिचं खाणं झालं की ट्यूशन , नंतर आणखी दोन क्लासेसला घेऊन जायचंय , आणायचं. कस्सा दिवस संपतो कळतच नाही.एकमेकींचं बोलणं ऐकून मग त्या खुदुखुदू हसत सुटल्या . दोघीही आपल्या आईची नक्कल करत होत्या. तेवढ्यात त्यांच्याबरोबर असणारी मात्र गप्पगप्प असणारी मैत्रेयी म्हणाली, “मला न माझ्या आईसारखं नाही व्हायचंय . सारखं कुठल्यातरी क्लासला घेऊन जाणारी .” मला तिच्याबरोबर , बाबांबरोबर राहायचंय मात्र त्यांना हे समजतच नाही . मला आजीसारखं व्हायचंय . आजी कशी छान राहते . सारा आणि जुई तिचं बोलणं ऐकून म्हणाल्या, “आम्हाला पण तुझ्यासारखंच वाटत मैत्रेयी .
डाॅ.स्वाती गानू टोकेकर
मुलांचं पूर्ण दिवसाचं गच्च वेळापत्रक पाहिलं की साडेचार तास शाळा,येण्याजाण्यासाठी अर्धा ते एक तास, ट्यूशन किंवा क्लासचे दोन तास असे किमान सात ते नऊ तास मुलं अभ्यास नामक गोष्टीसाठी मुलं गुंतलेली असतात. उरलेल्या वेळेत होमवर्क, असाईनमेन्ट, प्रोजेक्ट पूर्ण करतात.सेल्फ स्टडी करता वेळही नसतो आणि एनर्जीही नसते.इच्छा तर मुळीच नसते पण अभ्यास तर करावाच लागतो.परीक्षा जवळ आली की पालकांकडूनही प्रेशर यायला सुरुवात होते.मुलांमध्ये स्थिरता कमी असल्याने बैठक फार तर अर्ध्या तासाची असते.मुलं कंटाळतात म्हणून अभ्यास करण्याचे हे टेक्निक वापरून पहा.
●या टेक्निकला PORODOMO म्हणतात.
●Francesco Cirilo या व्यावसायिकाने 1980 च्या उत्तरार्धात हे टेक्निक वापरलं.तो टायमर म्हणून टोमॅटोच्या आकाराचे घड्याळ वापरायचा.इटालियन भाषेत टोमॅटोला Pomodoro म्हणतात. म्हणून या टेक्निकचं नाव Pomodoro पडलं.
प्रत्येकाची स्वतःची एक प्रतिमा असते. आपण स्वतःबद्दल जो विचार करतो ती आपली प्रतिमा बनते. आपण आपली प्रतिमा एकटेच नाही बनवत. अनेक बाहयघटक त्यासाठी कारणीभूत असतात. आपली प्रतिमा ही बऱ्याच अंशी आपल्या बालपणीच्या अनुभवांवर अवलंबून असते. आपल्या आईवडिलांची आपल्याविषयीची मतं, आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारलेले टोमणे, मित्रमैत्रिणींची आपल्याविषयीची मतं, शाळेतील अनुभव; या आणि अशा अनेक घटकांनी प्रेरित होऊन आपण स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो. आपल्या मनाला आपण सांगतो की हा मी असा आहे किंवा ही मी अशी आहे.
खरेच ऑनलाईन अभ्यासाची लहान मुलांना गरज आहे का…?????
मला असे वाटत नाही..
बऱ्याच शाळा ऑनलाईन सुरु झाल्या. ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन छंदवर्ग, ऑनलाईन स्पेशल ट्युशन वगैरे वगैरे…..
पण यात तुमच्या लक्षात येते आहे का की मुले बरेच तास स्क्रीन समोर आहेत…. आणि याच स्क्रीन साठी ते पॅनिक होत आहेत… तुमचे खरेच आहे की लॉकडाऊन मुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे…. पण काही पालकांना ही याचे अप्रूप आहे. आमची मुले ऑनलाईन अभ्यास करतात… याचे समाजमाध्यमावर फोटोही टाकले…. छान…. पण यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे काय????? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे…. मुलांना शिक्षकांची गरजच वाटेनाशी होत आहे. आता काय सगळेच यूट्यूब वर आहे… कशाला माहिती डोक्यात साठवा.. असेही मुलं सहज म्हणतात… मी या शिक्षणाच्या विरोधात नाही आहे…. पण लहान मुलांच्या डोक्यात इतक्या झपाट्याने आदळतंय की ती मुलं बिचारी कावरीबावरी झाली आहेत. त्यात आता परिस्थिती मुळे मुलं 24तास घरात आहेत मग मनोरंजना साठी टीव्ही, मोबाईल ओघाने आलेच…. बापरे…..
मुलांच्या कल्पकतेला, सृजनतेला आपण वेळ देत आहोत का????( आपण मध्ये सगळेच आलो )
अनेक तत्ववाद्यांचे, शिक्षण तज्ज्ञांचे असे मत आहे की “शांततेत सृजनता फुलते..”
मुलांना शांतता द्या.. त्यांना रिकामा वेळ द्या. ती मुले स्वतः च आपले खेळ निर्माण करतात, नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती जेव्हा खेळ निर्माण करतात तेव्हा ते अभ्यासच करत असतात. शिकवण्यापेक्षा स्वतः च्या चुकांतून, अनुभवातून शिकण खूप मोलाचे आहे. रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे, महात्मा गांधी यांचे फक्त गोडवे न गाता त्यांची शिक्षण पद्धती अमलात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे….. काय माहिती आज पालकांना ऑनलाईन अभ्यासाची गरज भासऊन त्यांना पॅनिक करून, ऑनलाईन अभ्यास नाही केला तर मुलं ‘ढ’ राहतील असा बिनबुडाचा धोका निर्माण करून काही लोक करोडो कमवत नसतील ना????? …. याचा विचार करा….
आपण सुजाण पालक आहोत
सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत… आई आणि बाबा म्हणून वेळ देऊया मुलांना… माझ्यात व्यक्ती म्हणून जे चांगले आहे ते देऊया ना आपण मुलांना. महेश काळे यांची पहिली संगीताची गुरु त्यांची आईच आहे इथे खूप उदाहरणे देता येतील विज्ञान क्षेत्रात, कला क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांच्या उत्कर्षाचा पाया त्यांच्या आई वडिलांनी उभा केला आहे.. वडील तबला वादक आहेत मुलाला शिकवा, आई छान स्वयंपाक करते शिकवा, अक्षर सुंदर असणे, रांगोळी छान काढणे, कपाट नेटके लावणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, बुद्धिबळ, नवा व्यापार, शिकवणे. मुलांना मनाचे श्लोक, गीतापठण, निबंध लेखन, गणित, तुमची मातृभाषा शिकवा फार गरज आहे आता…..गाणी, नृत्य, कविता लिहिणे.., गोष्ट सांगने आणि तयार करणे इत्यादी……. एक माझ्या ओळखीतले गणिततज्ञ आहेत एकदा त्यांना विचारले कशी काय गणितात आवड निर्माण झाली… तर ते म्हणाले, की माझे बाबा रोज एक गणित फळ्यावर मी उठायच्या आत लिहून ठेवत आणि ते सोडवल्यावरच खाली खेळायला सोडत असत, रोज वेगळा विचार वेगळं गणित मज्जा येत असे…यातच गोडी लागली… जेवना आधी रोज पाढे….
बऱ्याच गोष्टी आहेत हो ज्या आपण मुलांना शिकवू शकतो आपल्या भावनांचा स्पर्श असतो तिथे. आपले मातृत्व आणि पितृत्व आपण देत असतो. थोडक्यात संस्कारांची शिदोरी आपण या शिकवण्यातून देत असतो….
सोपे सांगायचं तर quality time द्या मुलांना
आपण स्वतः जे काही शिकवतो त्याद्वारे आपण नसल्यावरही आपण त्याच्या बरोबर असू…..सतत….त्यांच्या सुंदर आठवणीत….विचार करा आणि या ऑनलाईन च्या गुदमरुन टाकणाऱ्या, ताण देणाऱ्या शिक्षणापेक्षा आपला वेळ, सहवास त्याना देऊया कारण नोकरी मुळे आई बाबांना मुलांसाठी वेळच नसतो….ही चांगली संधी आहे मुलांना समजून घेण्याची आणि आईबाबा काय आहेत हे कळवून देण्याची…..मुलांशी बोला, गप्पा मारा, त्यांचे मित्र बना…..
“मुलं फार लवकर मोठी होतात हो….. ” वेळ नाही देत आपल्याला…………..c&p