‘ईगो’ (Ego-अहंकार) म्हणजे नक्की काय?
.
एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता.
.
त्याचा विचार होता की, एखाद्या निवांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे खाऊन फस्त करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की, काही गिधाडे त्याच्या पाठीमागे लागली आहेत.
.
ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की, ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत.

.
त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना.
.
कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता.
.
शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत बघितलंस ना… तु..?. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
.
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत.
.
तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते?’

.
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली.
.
मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली….!

आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो. या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego”=अहंकार) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..!

आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे,मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत चर्चा करताना चर्चेतील कुठलाही विषय असेल? तर मला माहीत आहे…! चर्चेत दुसऱ्याना खोटे ठरवून माझेच बरोबर आहे. अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला ईगो(अहंकार) कुरवाळत असतात.
मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात,

पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.

एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवू.. अहंकार विसरु..!अहंकार सोडून देऊ..
बघुया काय चमत्कार होतो ते..?