ती’ वयात येताना…
15 वर्षांच्या नेहाच्या दप्तरात तिच्या बाबांना एका मुलाचे प्रेम पत्र सापडते.. नेहाचे बाबा अत्यंत काळजीत.. त्या अवस्थेत ती चिठ्ठी ते नेहाच्या आईला दाखवितात.. आई थोडी गंभीर होते परंतु ही चिठ्ठी आपल्याला सापडली आहे हे नेहाला न कळून देण्याबाबत व तिच्याशी रोजच्या प्रमाणे वागण्याबद्दल नेहाच्या बाबांना विनंती करते… दुसऱ्या दिवशी सकाळी, आई नेहाला आवडणाऱ्या गरमा गरम पोह्यांची डिश घेऊन तिच्या खोलीत जाते.
अभ्यास करत बसलेल्या नेहाला म्हणते; नेहा अभ्यास जरा बाजूला ठेव बरं आणि हे गरमगरम पोहे खात माझ्याशी मस्त गप्पा मार. नेहाशी गप्पा मारता मारता आई म्हणते. अगं नेहा; आता आपण दोघी मैत्रिणी झालोत. नेहा थोडी बावचळते. अगं तू मोठी झालीस ना आता.आज तुझी आई म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नेहाच्या चेहऱ्यावर थोडे प्रश्नार्थक भाव उमटतात.
“नेहा, ज्याप्रमाणे शरीरात बदल व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक बदलही सुरु होतात. छोट्याछोट्या गोष्टींचा राग यायला लागतो, आपली चीडचीड वाढते, कधी कधी खूप उदास वाटतं, एकटं वाटतं आणि खूप रडू येतं तर कधी कारण नसतानाही उगीच हसू येतं, आणि हो कधी कधी माझा आणि बाबाचाही राग येऊ शकतो हं तुला.. या सगळ्या बदलांबरोबरच वयात येताना अजून एक निसर्गतः मोठा बदल आपल्यात होत असतो तो म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं; एखादी व्यक्ती इतकी आवडू लागते की आपण त्या आकर्षणलाच प्रेम समजून बसतो, पण बाळा या वयात जे होतं ते आकर्षण असतं.. प्रेम नसतं.. जसं एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर आपल्याला चटकिनी एखादा ड्रेस आवडून जातो अगदी त्याचप्रमाणे एखादा मुलगा या वयातील मुलींना आवडू शकतो.
कोणाला त्याचं दिसणं, आवाज, डोळे तर कोणाला त्याची स्टाईल, त्याचं बोलणं आवडतं आणि मुलांच्या बाबतीतही अगदी असंच होतं असतं. थोडक्यात हे बाह्य आकर्षण असतं. या वयातील मुलामुलींचं शरीर व मन अजून परिपक्व झालेलं नसतं. कोणावर प्रेम करण्याइतकी प्रगल्भता अजून त्यांच्यात आलेली नसते. आज एक, तर उद्या कोणी दुसरीच व्यक्ती आवडू लागते.. या वयात मनही थोडं अस्थिर आणि चंचल झालेलं असतं.. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यावं तेच कळत नसतं.
थोडक्यात सांगायचं तर; जसं जेवणाच्या ताटात विविध पदार्थांचा समावेश असतो; अगदी तसंच आपलं आयुष्य म्हणजे जेवणाचं ताट आणि त्यातील पदार्थ म्हणजे आपले आई-वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शाळा, आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती, हे सगळे! हे सर्व आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत ते म्हणजे आयुष्य नाही. परंतु ज्यावेळी आपण कोणा एका व्यक्तीलाच आयुष्य समजायला लागतो त्यावेळी अडचण निर्माण होते.
हे वय खूप नाजूक असतं गं बाळा. सगळं जग या वयात सुंदर दिसत असतं पण त्या सुंदरतेमागचं भयाण रूप मात्र दिसत नसतं.. या साठी सतत सावधान राहून या वयातील मुलांनी प्रवास केला पाहिजे, आकर्षणचा कितीही मोठा खड्डा या प्रवासात आला तरी तो चुकवून पुढे जाणंच फायद्याचं असतं. आकर्षणात अडकणं हा आपल्या ध्येयामधील खूप मोठा अडथळा असतो.
तो अडथळा आपल्या मार्गात येऊ नं देता आपण मार्गक्रमण करणं गरजेचं असतं. आपल्या आईचं हे सगळं बोलणं ऐकून नेहाला रडू अवरत नाही. ती उठून आईला कडकडून मीठी मारते आणि आतून आपल्या दप्तरातून ती चिठ्ठी आणून आईला दाखवत म्हणते; आई मी ही या खड्ड्यात पडणार होते गं; पण तू वाचवलंस मला.. आता कितीही मोठे खड्डे आले तरी मी ते सहज पार करू शकेन ही आता खात्री वाटते कारण आता या प्रवासात मी एकटी नाही तू ही आहेस माझ्याबरोबर..आई ही तिला जवळ घेऊन; आपण तिच्या बरोबर असल्याचा विश्वास तिला स्पर्शाने देते.
वयात आलेल्या प्रत्येक मुलांच्या पालकांचा त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाचा संवाद असणे गरजेचे असते.. या संवादाच्या अभावामुळेच बहुतांशी वयात आलेली मुले ही चुकीच्या दिशेने वाहवत जाण्याची शक्यता असते.. अनेक शंका, उत्सुकता यांनी त्यांना घेरून टाकलेले असते त्यामुळे त्यांच्या शकांचे निरसन व दमन झालेल्या उत्सुकतांचे शमन हे पालकांमार्फत योग्य पद्धतीने झाल्यास मुले त्यांचा टीन एजमधील प्रवास नक्कीच हसत खेळत पार करू शकतील..
– मृणाल घोळे मापुस्कर (लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असून पंख संस्थेच्या समुपदेशक आहेत)