डाॅ. स्वाती गानू 

प्रसंग १

सारा आणि जुई नऊ वर्षांच्या एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन छोट्या मैत्रिणी, घराच्या मागच्या टेरेसवर भातुकली खेळत होत्या. सारा म्हणाली, “अग जुई माझी इतकी घाई आहे न किचनमध्ये लंच करायचंय . मग टिफीन पॅक करायचे. रौनकला शाळेत सोडायचंय .” आणि मुव्ह फास्ट असं ती स्वतःशीच बडबडली . जुई म्हणाली ,” सारा मला पण दुपारी सुरभीला स्कूलमधून आणायचंय . तिचं खाणं झालं की ट्यूशन , नंतर आणखी दोन क्लासेसला घेऊन जायचंय , आणायचं. कस्सा दिवस संपतो कळतच नाही.एकमेकींचं बोलणं ऐकून मग त्या खुदुखुदू हसत सुटल्या . दोघीही आपल्या आईची नक्कल करत होत्या. तेवढ्यात त्यांच्याबरोबर असणारी मात्र गप्पगप्प असणारी मैत्रेयी म्हणाली, “मला न माझ्या आईसारखं नाही व्हायचंय . सारखं कुठल्यातरी क्लासला घेऊन जाणारी .” मला तिच्याबरोबर , बाबांबरोबर राहायचंय मात्र त्यांना हे समजतच नाही . मला आजीसारखं व्हायचंय . आजी कशी छान राहते . सारा आणि जुई तिचं बोलणं ऐकून म्हणाल्या, “आम्हाला पण तुझ्यासारखंच वाटत मैत्रेयी .

प्रसंग २
“तुझा का हट्ट आहे मुंबई सोडून पुण्याला शिकायला जाण्याचा? ” सौमित्रची आई, बाबा, दोघंही रागावून विचारत होते. सौमित्रची ‘सुनीताआत्या’ पुण्याला होती. सौमित्रसारखा ‘ब्रिलियंट मुलगा ‘ हे कसलं खूळ डोक्यात घेऊन बसलाय त्यांना कळेना . सुनीताआत्या आणि रमाकांतकाकांना दोन मुलं होती आणि सौमित्रला त्यांच्याबरोबर आत्याकडे राहायला आवडायचं . १० वी नंतर तिच्याकडेच जाऊन राहायचं . तिथेच शिकायचं असं त्याने ठरवून टाकलं . आई-बाबांशी वाद होताना सौमित्र संतापून म्हणाला ,”तुम्ही माझ्या डोक्यावर एखादया उपग्रहासारखे भिरभिरत असता . ह्या ट्यूशनकडून त्या क्लासला नेता . सुट्टीत २-३ शिबिराला घेऊन जाता . ढीगभर क्लाससाठी घेऊन फिरत आलात इतकी वर्ष . मी लांब गेल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि तुमचं लाईफ जगणार नाही. मला नाही कधी तुमच्यासारखे पॅरेन्टस् व्हायचं . सौमित्रचं हे बोलणं ऐकून त्याचे आई-बाबा बघतच राहिले.

मैत्रेयी , सारा, जुई, सौमित्र या मुलांनी असं म्हणावं की ‘आम्हाला आमच्या पालकांसारखं व्हायचं नाही’ हे वाक्य सगळ्या पालकांना विचार करायला लावणारं आहे. स्वतःच्या वागण्याचं प्रतिबिंब जगण्याच्या आरशात पहायला लावणारं आहे . मुलं आपली आहेत . त्यांनी खूप शिकावं , मोठं व्हावं , विविध कलांमध्ये प्रवीण व्हावं , खेळात नाव कमवावं , नव नवीन तंत्रज्ञानात मास्टरी मिळवावी , ‘पालक ‘या नात्याने तुम्ही त्यांच्याविषयी पाहिलेली स्वप्नं त्यांनी पूर्ण करावी यासाठी प्रत्येक आई-बाबा ही धडपड करतात हे खरं असलं तरी या क्लासेस , ट्यूशन्सच्या चक्रव्यूहात मुलांची स्वतः काही करण्याची , विचार करण्याची प्रक्रियाच थांबवून टाकली आहे. माझ्या परिचयातल्या एक महिला ‘बालभवन ‘सारखे कृतीशील वर्ग त्यांच्या परिसरात सुरु करत होत्या . विविध विषयांवर मुलांनी विचार करावा , व्यक्त व्हावं , मतं मांडावी , कृती कराव्या . वेगवेगळ्या गोष्टींची तंत्रे शिकावी, प्रतिसाद कसा द्यावा आणि बरंच काही. जसं नाटक, कवितांचं अभिवाचन अशा अनेक गोष्टींचा अनुभव मुलांनी घ्यावा हा त्यांचा हेतू होता . मात्र सुशिक्षित , सुजाण पालकांनी शाळा, अभ्यास, ट्यूशन्स,क्लासेस(छंदवर्ग ) या महत्वाच्या मानल्या आणि मुलांना इतक्या अनोख्या अनुभवांपासून वंचित ठेवलं . ह्यात मुलं तर भरडून निघत आहेतच . त्यांचं स्वतंत्रपणे विचार करणंच संपत चाललंय . शिवाय याची दुसरी बाजू त्याहीपेक्षा जास्त धोकादायक आहे.
मुलांच्या मालकी हक्कात अडकलेले आपण स्वतःचं जगणंच विसरून चाललोय . मुलं फार भराभर मोठी होतात . त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात . ते स्वतःच्या बळावर उंच भरारी मारण्याची इच्छा करतात. मगं आपला अट्टाहास सुरु की त्यांच्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात ठेवण्याचा . अगदी मोठी झाली, त्यांची लग्न झाली तरी मुलगा, जावई, सून-मुलगा यांच्या आयुष्यातही हा लगाम आपण सोडत नाही . आपल्याला काय अवडंतं, काय करता येतं , कशाने आनंद मिळतो, कशातून समाधान वाटतं याचा विचारच मागे पडलाय . कसं वाढावं , मोठं व्हावं हे मुलांना शिकवताना आपलं मोठं होणं कुठेतरी हरवतंय . पालक म्हणून त्यांच्या ज्या ज्या बाबीत आपण सोबत असायला हवंय ते करायचं आहेच पण त्यासोबत आपली स्वतःशी असणारी साथ-संगत सुटत तर चालली नाही याचं भान यायला हवं .
मुलं मोठी झाली की आपल्यापासून लांब जातात . शिक्षण, नोकरी, लग्न, अन्य जबाबदाऱ्यांमुळे अजाणतेपणी त्यांचा आपल्या आईवडिलांशी पाहिजे तेवढा संपर्क होऊ शकत नाही. बोलणं व्हावं ,चौकशी करावी, प्रकृतीबाबत त्यांनी आपली काळजी करावी अशा वेगवेगळ्या अपेक्षा असणारे आपण पुरते एकटे पडतो कारण सतत मुलांसाठीच फक्त जगणं झालेलं असतं . काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण सुरेख गात होतो,कॉम्पेअरिंग करायचो, रोज टेनिसच्या मॅचेस व्हायच्या , आपल्या ग्रुपचे लीडर होतो, केटरिंगमध्ये मास्टरशेफ होतो ते त्याच वयात थांबवून ठेवल्याने हे सारं धूसर होतं . मग मी मुलांसाठी किती केलं , आयुष्यातली सारी उमेदीची वर्ष त्यांच्यासाठी घालवली आणि आज मुलं जाणती झालीत तर आमच्यकडे दुर्लक्ष करतात असं म्हणणं , मुलांना इमोशनल ब्लॅकमेल करणं, ह्याची गरज का भासते याचा विचार आत्ताच करायला हवा .
आपल्यापैकी काहीजण नोकरी, व्यवसाय करत असतील . काही घरीही असतील वेळ जाणं आता सोपंही आहे पण स्वामित्वाची , गाजवण्याची जी मनाला सवय लागली आहे त्या मनाला नंतर समजावणं, साऱ्यातून अलिप्त होणं , हे जमणं कठीण होऊन बसतं . म्हणून आज हो अगदी आत्ताच हा विचार करायला हवा की आपण आपलं असं , स्वतःसाठीसुद्धा जगू या. पुन्हा एकदा स्वतःशी संवाद करू या. आपल्या आनंदाच्या जागा शोधू या. कारण स्वतःलाही न्याय द्यायला हवा . त्या अस्तित्वाला जगू द्यायला हवं . खरंच किती दिवस झाले, महिने, वर्षे झाली निवांतपणे बसलात , आपल्या आवडीचं काही केलंत . तुमच्यातली creativity , रसिकता, खिलाडूवृत्ती, माणूसपण तुम्हाला जागवायचंय आणि असं आहे की ज्या जीवाला आपण जन्माला घातलं त्याला तर प्रेमाचं शिंपण करायचं आहेच . मायेची सावली त्याच्यावर धरायची आहेच पण त्यासाठी स्वतःला विसरून जायचं नाहीये .
मुलं भुर्रकन उडून गेल्यावर आयुष्याच्या संधिकाली रडत बसून , कुढत राहून , स्वतःची कीव करून, नैराश्याच्या गर्तेत जाणं, नाहीतर या साऱ्यातून स्वतःला वजा करून टाकणं यापेक्षा आपल्या आवडत्या जगाशी पुन्हा नव्याने ओळख करायची . हाताच्या मुठीतून आपलं जगणं निसटून जाण्याच्या आत त्याचं एक सुरेख शिल्प घडवायला हवं . म्हणजे आपल्या मुलांना पालक म्हणून आपल्यासारखंच बनावं असं वाटेल.

मुलांवरच्या मालकी हक्कात आपण स्वतःला तर विसरून जात नाही आहोत ना???

डाॅ. स्वाती गानू 

प्रसंग १

सारा आणि जुई नऊ वर्षांच्या एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन छोट्या मैत्रिणी, घराच्या मागच्या टेरेसवर भातुकली खेळत होत्या. सारा म्हणाली, “अग जुई माझी इतकी घाई आहे न किचनमध्ये लंच करायचंय . मग टिफीन पॅक करायचे. रौनकला शाळेत सोडायचंय .” आणि मुव्ह फास्ट असं ती स्वतःशीच बडबडली . जुई म्हणाली ,” सारा मला पण दुपारी सुरभीला स्कूलमधून आणायचंय . तिचं खाणं झालं की ट्यूशन , नंतर आणखी दोन क्लासेसला घेऊन जायचंय , आणायचं. कस्सा दिवस संपतो कळतच नाही.एकमेकींचं बोलणं ऐकून मग त्या खुदुखुदू हसत सुटल्या . दोघीही आपल्या आईची नक्कल करत होत्या. तेवढ्यात त्यांच्याबरोबर असणारी मात्र गप्पगप्प असणारी मैत्रेयी म्हणाली, “मला न माझ्या आईसारखं नाही व्हायचंय . सारखं कुठल्यातरी क्लासला घेऊन जाणारी .” मला तिच्याबरोबर , बाबांबरोबर राहायचंय मात्र त्यांना हे समजतच नाही . मला आजीसारखं व्हायचंय . आजी कशी छान राहते . सारा आणि जुई तिचं बोलणं ऐकून म्हणाल्या, “आम्हाला पण तुझ्यासारखंच वाटत मैत्रेयी .”

प्रसंग २
“तुझा का हट्ट आहे मुंबई सोडून पुण्याला शिकायला जाण्याचा? ” सौमित्रची आई, बाबा, दोघंही रागावून विचारत होते. सौमित्रची ‘सुनीताआत्या’ पुण्याला होती. सौमित्रसारखा ‘ब्रिलियंट मुलगा ‘ हे कसलं खूळ डोक्यात घेऊन बसलाय त्यांना कळेना . सुनीताआत्या आणि रमाकांतकाकांना दोन मुलं होती आणि सौमित्रला त्यांच्याबरोबर आत्याकडे राहायला आवडायचं . १० वी नंतर तिच्याकडेच जाऊन राहायचं . तिथेच शिकायचं असं त्याने ठरवून टाकलं . आई-बाबांशी वाद होताना सौमित्र संतापून म्हणाला ,”तुम्ही माझ्या डोक्यावर एखादया उपग्रहासारखे भिरभिरत असता . ह्या ट्यूशनकडून त्या क्लासला नेता . सुट्टीत २-३ शिबिराला घेऊन जाता . ढीगभर क्लाससाठी घेऊन फिरत आलात इतकी वर्ष . मी लांब गेल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि तुमचं लाईफ जगणार नाही. मला नाही कधी तुमच्यासारखे पॅरेन्टस् व्हायचं . सौमित्रचं हे बोलणं ऐकून त्याचे आई-बाबा बघतच राहिले.

मैत्रेयी , सारा, जुई, सौमित्र या मुलांनी असं म्हणावं की ‘आम्हाला आमच्या पालकांसारखं व्हायचं नाही’ हे वाक्य सगळ्या पालकांना विचार करायला लावणारं आहे. स्वतःच्या वागण्याचं प्रतिबिंब जगण्याच्या आरशात पहायला लावणारं आहे . मुलं आपली आहेत . त्यांनी खूप शिकावं , मोठं व्हावं , विविध कलांमध्ये प्रवीण व्हावं , खेळात नाव कमवावं , नव नवीन तंत्रज्ञानात मास्टरी मिळवावी , ‘पालक ‘या नात्याने तुम्ही त्यांच्याविषयी पाहिलेली स्वप्नं त्यांनी पूर्ण करावी यासाठी प्रत्येक आई-बाबा ही धडपड करतात हे खरं असलं तरी या क्लासेस , ट्यूशन्सच्या चक्रव्यूहात मुलांची स्वतः काही करण्याची , विचार करण्याची प्रक्रियाच थांबवून टाकली आहे. माझ्या परिचयातल्या एक महिला ‘बालभवन ‘सारखे कृतीशील वर्ग त्यांच्या परिसरात सुरु करत होत्या . विविध विषयांवर मुलांनी विचार करावा , व्यक्त व्हावं , मतं मांडावी , कृती कराव्या . वेगवेगळ्या गोष्टींची तंत्रे शिकावी, प्रतिसाद कसा द्यावा आणि बरंच काही. जसं नाटक, कवितांचं अभिवाचन अशा अनेक गोष्टींचा अनुभव मुलांनी घ्यावा हा त्यांचा हेतू होता . मात्र सुशिक्षित , सुजाण पालकांनी शाळा, अभ्यास, ट्यूशन्स,क्लासेस(छंदवर्ग ) या महत्वाच्या मानल्या आणि मुलांना इतक्या अनोख्या अनुभवांपासून वंचित ठेवलं . ह्यात मुलं तर भरडून निघत आहेतच . त्यांचं स्वतंत्रपणे विचार करणंच संपत चाललंय . शिवाय याची दुसरी बाजू त्याहीपेक्षा जास्त धोकादायक आहे.
मुलांच्या मालकी हक्कात अडकलेले आपण स्वतःचं जगणंच विसरून चाललोय . मुलं फार भराभर मोठी होतात . त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात . ते स्वतःच्या बळावर उंच भरारी मारण्याची इच्छा करतात. मगं आपला अट्टाहास सुरु की त्यांच्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात ठेवण्याचा . अगदी मोठी झाली, त्यांची लग्न झाली तरी मुलगा, जावई, सून-मुलगा यांच्या आयुष्यातही हा लगाम आपण सोडत नाही . आपल्याला काय अवडंतं, काय करता येतं , कशाने आनंद मिळतो, कशातून समाधान वाटतं याचा विचारच मागे पडलाय . कसं वाढावं , मोठं व्हावं हे मुलांना शिकवताना आपलं मोठं होणं कुठेतरी हरवतंय . पालक म्हणून त्यांच्या ज्या ज्या बाबीत आपण सोबत असायला हवंय ते करायचं आहेच पण त्यासोबत आपली स्वतःशी असणारी साथ-संगत सुटत तर चालली नाही याचं भान यायला हवं .
मुलं मोठी झाली की आपल्यापासून लांब जातात . शिक्षण, नोकरी, लग्न, अन्य जबाबदाऱ्यांमुळे अजाणतेपणी त्यांचा आपल्या आईवडिलांशी पाहिजे तेवढा संपर्क होऊ शकत नाही. बोलणं व्हावं ,चौकशी करावी, प्रकृतीबाबत त्यांनी आपली काळजी करावी अशा वेगवेगळ्या अपेक्षा असणारे आपण पुरते एकटे पडतो कारण सतत मुलांसाठीच फक्त जगणं झालेलं असतं . काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण सुरेख गात होतो,कॉम्पेअरिंग करायचो, रोज टेनिसच्या मॅचेस व्हायच्या , आपल्या ग्रुपचे लीडर होतो, केटरिंगमध्ये मास्टरशेफ होतो ते त्याच वयात थांबवून ठेवल्याने हे सारं धूसर होतं . मग मी मुलांसाठी किती केलं , आयुष्यातली सारी उमेदीची वर्ष त्यांच्यासाठी घालवली आणि आज मुलं जाणती झालीत तर आमच्यकडे दुर्लक्ष करतात असं म्हणणं , मुलांना इमोशनल ब्लॅकमेल करणं, ह्याची गरज का भासते याचा विचार आत्ताच करायला हवा .
आपल्यापैकी काहीजण नोकरी, व्यवसाय करत असतील . काही घरीही असतील वेळ जाणं आता सोपंही आहे पण स्वामित्वाची , गाजवण्याची जी मनाला सवय लागली आहे त्या मनाला नंतर समजावणं, साऱ्यातून अलिप्त होणं , हे जमणं कठीण होऊन बसतं . म्हणून आज हो अगदी आत्ताच हा विचार करायला हवा की आपण आपलं असं , स्वतःसाठीसुद्धा जगू या. पुन्हा एकदा स्वतःशी संवाद करू या. आपल्या आनंदाच्या जागा शोधू या. कारण स्वतःलाही न्याय द्यायला हवा . त्या अस्तित्वाला जगू द्यायला हवं . खरंच किती दिवस झाले, महिने, वर्षे झाली निवांतपणे बसलात , आपल्या आवडीचं काही केलंत . तुमच्यातली creativity , रसिकता, खिलाडूवृत्ती, माणूसपण तुम्हाला जागवायचंय आणि असं आहे की ज्या जीवाला आपण जन्माला घातलं त्याला तर प्रेमाचं शिंपण करायचं आहेच . मायेची सावली त्याच्यावर धरायची आहेच पण त्यासाठी स्वतःला विसरून जायचं नाहीये .
मुलं भुर्रकन उडून गेल्यावर आयुष्याच्या संधिकाली रडत बसून , कुढत राहून , स्वतःची कीव करून, नैराश्याच्या गर्तेत जाणं, नाहीतर या साऱ्यातून स्वतःला वजा करून टाकणं यापेक्षा आपल्या आवडत्या जगाशी पुन्हा नव्याने ओळख करायची . हाताच्या मुठीतून आपलं जगणं निसटून जाण्याच्या आत त्याचं एक सुरेख शिल्प घडवायला हवं . म्हणजे आपल्या मुलांना पालक म्हणून आपल्यासारखंच बनावं असं वाटेल.