रणझुंजार सेनापती
संताजी घोरपडे

मृत्यू : १८ जून १६९७

संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी

यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे संताजी घोरपडे यांनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.

संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी – म्हाळोजीराव घोरपडे यांनी- कुरुंदवाड येथे प्रयागतीर्थ म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर एक सुब्रह्मण्येश्वर महादेवाचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. कुरुंदवाड संस्थानाधिपती श्रीमंत रघुनाथ दादासाहेब पटवर्धन यांनी मंदिराशेजारी नदीवर १७९५ साली एक घाट बांधला आहे एक महान सरसेनापतींच्या नावे(संताजी घोरपडे) .

या ठिकाणी दरवर्षी सत्संग व घाटपरिसर स्वच्छता मोहीम राबवली जाते.

🏵 सेनापती संताजी घोरपडे : पूर्वज

शिवाजी महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले; तीच परंपरा पुढे संभाजीच्या कालात हंबीरराव मोहिते यांनी चालू ठेवली. संभाजीराजांना आणि कवी कलशांना संगमेश्वर गावी शेख निजाम याने पकडले आणि त्याच वेळेस म्हाळोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोघलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि संभाजीच्या तालमीत तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्तावलेल्या मोघल बादशाहला गाडला. या योद्ध्यांत एक आघाडीचा वीर म्हणजे “सरसेनापती संताजी घोरपडे”. मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होऊच शकत नाही.

चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बाजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोळची जहागीर संभाळून होता, तर त्याचा दुसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजींचा नातू म्हणजे “म्हाळोजी घोरपडे” . यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली, तो वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, (sources- डॉ.जयसिंह पवार)

म्हाळोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वारानिशी येऊन मिळाले. म्हाळोजी हे पुढे पन्हाळगडाचे तट-सरनौबत होते. संभाजी जेव्हा दिलेरखानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पन्हाळ्यावर केली होती, आणि सोबतीस म्हाळोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो. संभाजीच्या संपूर्ण कारकिर्दीत म्हाळोजी घोरपडे हे स्वराज्य

राखण्याचे काम चोख करीत होते. शिरक्यांचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः संभाजीराजांच्या सोबत म्हाळोजी घोरपडे होते. मोगल सरदार मुकर्रबखान जेव्हा संगमेश्वर येथे संभाजीराजांस कैद करण्यास पोचला, तेव्हा म्हाळोजी घोरपडे यांनी लढाई केली, पण ते मारले गेले.

🔶 हंबीरराव मोहिते आणि संताजी घोरपडे

संताजी घोरपडे यांचे नक्की जन्म साल माहीत नसले, पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबीररावांच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुरहानपूर, जालना, सिंदखेड हे मुलूख लुटत हंबीरराव स्वराज्यात आले. हंबीररावांच्या विनंतीवरून संताजीस जुमलेदारी मिळाली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्त्वाची योजना होती. कोपल हे आदिलशाहीचे सरदार हुसैनखान आणि कासीम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबीरराव यांनी या पठाण बंधूंचा पाडाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले. पण जालन्याच्या स्वारीत संताजीच्या हातून काही तरी चूक झाली म्हणूनच शिवाजीमहाराजांनी त्यास मुजऱ्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालन्याची मोहीम ही शिवाजीमहाराजांच्या जीवनातील शेवटची मोहीम. जालना शहर मराठयांनी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि तो बरीच लूट परत घेऊन गेला, या युद्धात सिधोजी निंबाळकर कामी आले.

संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोघलांनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला. जुल्फिकारखान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खऱ्या अर्थाने एक नेता म्हणून उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर विळख्यातून सुखरूप बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाळा करत बेदनूरच्या राणीच्या साह्याने जिंजीस सुखरूप निघून गेले. येथे महाराष्ट्रात, संभाजीच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपणार या धुंदीत मोघल गाफील झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजीने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने व अवघ्या २००० सैन्यानिशी तुळापूर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानी करून सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) नंतर संताजींनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेऊन ते थेट पन्हाळ्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हें- डिसें) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजीने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जखमी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध). बहुधा तो युद्धातील जखमांमुळे मेला असावा.

पुढे हाच स्वातंत्र्य लढा संताजी-धनाजीने बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याची तर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)

जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजीत आणि राजारामराजांत वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते, त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडळी सल्ले देत होती. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासीमखान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासीम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरमनजीक कावेरीपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणि खान कांचीपुरमला पळून गेला, तिथे त्याने देवळांचा आश्रय घेतला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपून बसला. याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केली आणि ते याचप्पा नायका संगे मोगलांविरोधात लढू लागले. राजारामने संताजीससुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवांकडे देण्यात आले. येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोगलांविरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा जो १८५७ च्या क्रांतीपेक्षा ही किती तरी पटीने सरस होता. जाने १६९५ दरम्यान संताजीने कर्नाटकातून मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुभेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २००० सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पळून गेला. मराठ्यांनी बुरहानपूर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुभेदारास बांगड्यांचा आहेर पाठवला. नंतर संताजीने सुरत लुटण्याचा बेत आखला होता, पण शेवटी तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजीबरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पळून गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध)

संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासीमखानाबरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक नामवंत सरदार पाठवले होते. कासीमखानाबरोबर सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि कामबक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. त्यांना आपल्या गुप्तहेराकडून बित्तंबातमी मिळत होती. कासीमखानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाजाद खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पुरी वाताहत करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री फौजेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृतसुद्धा दिले नाही.(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध)

अवघ्या २००० सैन्यासोबत लाखोंच्या पटीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसून बादशाहाच्या छावणीचे कळस कापले. असे साहस करण्यासाठी ध्येयवेड असावे लागते .ते संताजी घोरपडेनीं दाखवले. प्रत्येक इतिहासप्रेमीच्या अंगावर रोमांच उभे रहावे असेच हे धाडस होते.

🔷 घोडे पाणी पीत नसतील तर..

मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील तर त्यांना ‘पाण्यात संताजी-धनाजी दिसतात का,’ असे विचारले जाई.

⏳ मृत्यू

नागोजी माने याने संताजी घोरपडेंना बेसावध असताना मारल्याची नोंद इतिहासात आहे.तसेच या कटामध्ये नागोजी माने सोबतच छत्रपती राजारामराजे आणि धनाजी जाधव सुद्धा तितकेच जबाबदार आहेत।.

🏛 समाधी

कुरुंदवाड येथल्या (दत्ताचे प्रसिद्ध ठिकाण नरसोबाचीवाडी वरून हे ठिकाण दिसते. अवघ्या 400 मीटर अंतरावर आहे.) पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरील सुब्रह्मण्येश्वर महादेवाच्या समोर संताजी घोरपडे यांची समाधी आहे. येथे संताजी घोरपडे यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन केले गेले.

आणखी एक समाधी :- सातारा जिल्ह्यात आहे. म्हसवड गावापासून दहा किलोमीटर अंतरावर कारखेल गाव आहे. त्या गावात ही समाधी आहे.

🛤 रस्त्याला नाव

पुणे शहरातल्या कसबा पेठेतील एका रस्त्याला ‘वीर संताजी घोरपडे रस्ता’ असे नाव दिले आहे. (आधीचे नाव – जुना बाजार रस्ता)

🎞 चित्रपट

संताजीच्या आयुष्यावर दिनकर द. पाटील यांनी १९६८ साली ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा मराठी चित्रपट काढला होता.

📚 संताजी घोरपडे यांची चरित्रे

अजिंक्य (कादंबरी, अजिंक्य दशरथ पाटील)
अद्वितीय सेनानी सेनापती संताजी घोरपडे (बाळासाहेब माने, म्हसवड)
कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याचा इतिहास (स.मा.गर्गे, शं.ह वर्टीकर)
झुंजार सेनापती संताजी घोरपडे (प्रभाकर बागुल)
नरवीर सेनापती संताजीराव घोरपडे (चित्रकार शशिकांत बापूसाहेब पाटील)
रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे (महेश तेंडुलकर)
रणधुरंधर संताजी घोरपडे (शीला रिसबुड)
संताजी (कादंबरी, काका विधाते)
सेनापती संताजी घोरपडे (जयसिंगराव पवार)