अहमदनगर मधील पारनेर तालुका अनेक आश्चर्याने भरलेला आहे त्यातच निघोज चे रांजणखळगे म्हणजे आशियातील सर्वात मोठे रांजणखळगे..
या गावात “श्री मळगंगा माउली”चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. याची उंची ८५ फ़ूट आहे व संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे. आणि मातेची स्वयंभू मूर्ती आहे.
या मंदिरासमोर २५ फ़ुटी, दीपमाळ आहे.
गावापासून तीन कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात रांजणखळगे आहेत.
तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.
सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते. आम्हीही हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.
नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब आहेत भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रीयेमुळे नदीच्या पात्रात हे रांजण खळगे तयार झाले आहेत.
या खळग्यातून लांबून जोरात वहात आलेले पाणी तिथल्या तिथेच एखाद्या छोट्या धबधब्याप्रमाणे कोसळत होते. काही खळग्यांच्या धारदार काठांवरून पाण्याचे तुषार उडताना दिसतात.
कुकडी मातेचे पाणी एका रांजण खळग्यातून दुसऱ्यात लपंडाव खेळत उड्या मारत पुढे जाताना बघून आपण जणू संमोहितच होतो.
काही कुंडात पाणी साठून राहिल्याने त्यात दुर्मीळ अशी हायड्रिला वनस्पती तयार होते. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी इथे वनस्पती शास्त्रज्ञ भेटी देतात.
या रांजणखळग्यातून वहात पुढे ही कुकडी नदी खडकांच्या तयार झालेल्या दोन अजस्र भिंतींमधून वाहते
या रांजणखळग्यांच्या वरच्या भागात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. एकंदरीतच सगळीकडे पाणी आणि हिरवाई बघून डोळे निवतात.
या रांजण खळग्यांना क्रॉस करून गेलं की इथेही मळगंगा मातेचं मंदिर आणि भक्त निवास आहे. एक मोठा सभामंडप आहे.
गेल्या दोन तीन वर्षात रांजण खळग्यांचा हा प्रवाह क्रॉस करण्यासाठी एक सुंदर झुलता पूल बांधला आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे आणि या पुलामुळे पर्यटनस्थळ म्हणून या जागेचे सौंदर्य वाढले आहे.
या ठिकाणाच्या भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे इथे वनस्पतीशास्त्रद्न्य, भाविक, पक्षीप्रेमी, इतिहास संशोधक, भूगोल अभ्यासक, विद्यार्थी असे विविध स्तरातील पर्यटक भेटी देतात.
बाकी चैत्रात यात्रा, नवरात्रात उत्सव, उरूस यांची धामधूम संपूर्ण वर्षभर चालूच असते.