Back to Top

Category: Teachers

HOW TO INSPIRE MANNERS IN YOUR CHILDREN.

1. When entering the house greet your children or even hug them. This should help develop their sense of love and self worth.

2. Be good to your neighbours and never backbite. Never speak ill of other drivers when on the road. Your children would listen, absorb and emulate.

3. When calling your parents, encourage your children to speak to them. When visiting your parents take your children with you. The more they see you take care of your parents,the more they will learn to take care of you.

4. When driving them to school, don’t always play albums or cds in the car. Rather, tell them some motivational stories yourself. This will have a greater impact – trust me!

5. Read to them a short story and even a scripture a day – it doesn’t take much time, but very impactful in creating strong bonds and wonderful memories.

6. Comb your hair, clean your teeth and wear presentable clothes even if sitting at home and not going out for the day. They need to learn that being clean and tidy has nothing to do with going out!

7. Try not to blame or comment on every word or action they say or do. Learn to overlook and let go sometimes. This certainly builds their self-confidence.

8. Ask your children’s permission before entering their rooms. Don’t just knock and enter, but then wait for a verbal permission. They will learn to do the same when wanting to enter your room.

9. Apologize to your children if you made a mistake. Apologizing teaches them to be humble and polite.

10. Don’t be sarcastic or make fun of their views or feelings, even if you “didn’t mean it” and was “only joking”. It really hurts.

11. Show respect to your children’s privacy. It’s important for their sense of value and self-esteem.

12. Don’t expect that they will listen or understand the first time. Don’t take it personal. But be patient and consistent.

13. Pray with them. Show them how to pray. Lead by example.

14. In addition, ask them to discuss their daily plans after the morning prayers. Children without concrete daily plans usually join others in executing theirs. They fall easy to peer pressure.

15. Hold them and bless them specially every morning.

16. Always tell beautiful stories about your home town and village. Make them look forward to visiting there.

Remember other parents may need this, why keep it to yourself…! Kindly share further please.

मुलांचा अभ्यास

मुलांचा अभ्यास करून घेण्याविषयी मार्गदर्शन
भाग-१

मारुन अभ्यास कधीच घेवू नका त्यातून जो मानसिक धका बसतो त्यामुळे अभ्यास हा केवळ काहीतरी पुर्ण करायचे आहे असाच केला जातो त्यात कधीच आवड निर्माण होऊ शकणार नाही.
छ्डी वाजे छमछम आणि विद्या येई घमघम हा निव्वळ घोकमपट्टीचा भाग आहे. प्रत्यक्षात डोक्यात काही शिरेलच असे नाही.
साधारण ४ ते १० वर्षापर्येंत मुलांना अभ्यासाची गोडी थोड्या उशीरानेच लागते त्यात पालकांचा आणि शिक्षकांचा सकारात्मक संवाद अपेक्षित असतो. या वयात मुले कविता किंवा गाणी असे सहज बडबडतात पण घोड पेंड खाते ते लिहायच्या वेळी. त्यात प्रामुख्याने तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे वेळ लागणे, हात दुखणे आणि अभ्यासाच्या
वेळी इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध असणे ही कारणे देता येतील.
मुलांच्या हातात पेन्सिल किंवा पेन बसावा यासाठी मातीची खेळणी करायला देणे , पीठाच्या वस्तू बनविणे असे काही प्रकार करावेत ( हे सर्व शाळांमध्ये होत असले तरी घरी पुन्हा पुन्हा करावे).
बहुतांशी मुलांना जो अभ्यास करायचा आहे तो येत असतो मात्र तेच तेच पुन्हा पुन्हा लिहायचा ते कंटाळा करतात.
उदा तुम्ही त्यांना १,२,३,४ लिहायला सांगितले तर ते आवडीने लिहितील पण फक्त १ हा अंक १० वेळा लिहायला सांगितला तर ते लिहणार नाहीत.
प्रथम त्यांची सायकोलॉजी समजून घ्या
त्यांना खेळणी प्रिय असतील तर खेळणी घेवून अभ्यासाला बसा तुम्हीही ती खेळणी खेळा आणि खेळता खेळता जसे आपण त्यांना घास भरवायचो तसाच अभ्यास घ्या , त्यासाठी तुम्हालाही काही काळ मूल व्हावे लागेल ते व्हा.
शक्य असल्यास त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये त्यांना बसवून अभ्यास करायला सांगा , (इट वर्क )
ज्या दिवशी पुर्ण होमवर्क केला गेला त्या दिवशी आवर्जून मुलांचे कौतूक करा.
उच्चार सुधारण्यासाठी त्याच्याच आवडीची गाणी कविता, प्रार्थना हे मोठ्याने वदवून घ्या . होम वर्क अपुर्ण असणे म्हणजे त्याला येत नाही असे मुळीच नाही जरा आवड निर्माण झाली कि होईल सुरळीत सगळे.

धीर धरी रे…

धीर धरी रे……..

अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा परिसर त्यादिवशी अगदी गजबजलेला होता. एका आगळ्या वेगळ्या प्रयोगासाठी अनेक छोट्या मुलामुलींना आमंत्रित केले गेले होते. चार ते सहा वयोगटातील ही मुले आपल्या पालकांबरोबर तिथे जमली होती. प्रयोगासाठी संशोधक तयार होते. जिथे प्रयोग होणार होते, ते हाॅल, वर्ग छुप्या कॅमे-यांनी सज्ज होते. मुलांना आत बोलावले गेले. त्यांच्यासमोर छानश्या प्लेटमध्ये त्यांची आवडती मिठाई…. ‘मार्शमेलो’ ठेवली होती. सगळा बालचमू अगदी खूष! पण………
प्रयोगाची एक अट सांगण्यात आली. “जी मुले हा खाऊ 20 मिनिटे न खाता तसाच ठेवतील, त्यांना बक्षीस म्हणून दोन मार्शमेलो मिळतील!”
म्हटलं तर अट अगदी सोपी होती. पण म्हटलं तर अतिशय अवघड!! अत्यंत आवडती वस्तू समोर असूनही त्याचा आस्वाद न घेता नुसतं पहात रहायचं? कसं शक्य होईल? आणि मुलांची वयं तरी काय? चार ते सहा वर्षे! मुलांच्या हालचालींचे, हावभावांचे पूर्ण चित्रीकरण करण्यात येत होते. बरीच मुले नाही थोपवू शकली स्वतःला! काहींनी भरपूर प्रयत्न केला; पण अगदी शेवटी शेवटी त्यांचा संयम संपला. पण काहींनी, अगदी मोजक्या मुलांनी दोन मार्शमेलो मिळवले!!! जिंकले ते!!
पण, मानसशास्त्रज्ञ, संशोधक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे बरीच वर्षे या मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीचा मागोवा घेतला. या सर्व मुलांच्या संपर्कात राहिले संशोधक! आणि त्यांना असे आढळून आले की, जी मुले स्वतःवर संयम ठेवू शकली, धीर धरू शकली; ती मुले पुढील आयुष्यात बाकी मुलांपेक्षा जास्त यशस्वी झाली.
या प्रयोगाने मानसशास्त्राच्या विश्वात एक वेगळा ठसा उमटवला. आजही अनेक वर्षांनंतरही ही चाचणी एक मापदंड म्हणून ओळखली जाते आणि यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली म्हणून ‘स्व-संयम’ हा गुण वाखाणला जातो.
मंडळी, पाश्चात्य संस्कृतीचा उदोउदो करणारे आपण; हे मात्र विसरतो की, आपली लोकसंस्कृती कितीतरी वर्षांपूर्वी आपल्याला हेच शिकवून गेली आहे……. “धीर धरी रे धीरापोटी __असती फळे रसाळ, गोमटी!” धीर, संयम, स्वनियंत्रण हे सगळे साधारण समानार्थी शब्द म्हणायला हरकत नाही.
धीर धरणं, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करणं, वाट पाहणं; अपयश पचवून पुन्हा उसळी मारून उभं रहाणं; ही सगळी यशस्वी जीवनासाठीची नैतिक मूल्यं आहेत, असं म्हणता येईल. पण त्यासाठी मनाच्या ताकदीचा अगदी कस लागतो. या सगळ्या तत्वांमधून मनाच्या ताकदीचे अनुमान लावता येते. अर्थात ही ताकद काहीजणांना उपजत असते, तर काहीजणांना कमवावी लागते आणि ही ताकद कमावण्यासाठी बालपण आणि कुमारावस्था हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. पौगंडावस्था हा तसा परीक्षेचा काळ म्हणायला हरकत नाही.
आणि म्हणून, पालक मित्र मैत्रिणींनो, जागे व्हा! पालकत्व ही एक जागरुकतेने आणि विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे; याची जाणीव ठेवणे, हे अतिशय महत्वाचे सूत्र आहे आयुष्यातले! आपण मुलांना कसं वाढवतो आहोत, याचं आत्मपरीक्षण करा!
आजच्या instantच्या जमान्यात ‘धीर, संयम’ हे शब्दही मुलांच्या शब्दकोशातून हद्दपार व्हायला लागले आहेत. तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत त्याची पूर्तता करण्यासाठी पालकांची चढाओढ लागलेली दिसते आहे. “जेवढ्या तत्परतेने आम्ही मुलांच्या इच्छा पूर्ण करू, तेवढे आम्ही उत्कृष्ट पालक!” असा एक भ्रम आजच्या नवीन पालकपिढीत होताना दिसत आहे. न देऊ शकलेल्या वेळाची भरपाई म्हणून वस्तूंचा वर्षाव करणे, मागणीपेक्षा जास्त पुरवठा करत रहाणे आणि मुलांना काहीही कष्ट पडू नयेत, कमी पडू नये म्हणून आयुष्य वेचणारे पालक आज घरोघरी दिसत आहेत.
पण परिणामांचा विचार कधी आणि कोण करणार? आपणच आपल्या मुलांना अधू, अपंग बनवत आहोत; याची समज कधी येणार? Instant Gratification… तात्काळ इच्छापूर्तीची सवय लागलेली ही मुलं आयुष्यात आव्हानांना तोंड कशी देणार? कष्ट करून मिळवलेल्या यशाचा आनंद यांना कसा चाखायला मिळणार? याचा विचार करणं, ही खरी काळाची गरज आहे. प्रसंगी थोडं कठोर व्हावं लागलं तरी चालेल, पण मुलांमध्ये ‘श्रम संस्कार’ रूजवा; असं सांगणारी वडीलधारी मंडळी आज का दिसत नाहीयेत?
बटन दाबलं की पंखा सुरू होतो, तसं मनात इच्छा आली की ती पूर्ण झाली पाहिजे आणि मग एखाद्या वेळी अपयश आलं, वाट पहावी लागली की, मग आयुष्याचे प्रयोजन संपल्याप्रमाणे ही पिढी नैराश्याच्या गर्तेत जाताना दिसते, आत्महत्या करताना दिसते; नाही तर मग व्यसनांचा आधार आहेच! गुगलने माहितीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती केली आहे, हे जरी खरे असले, तरी लोकांना अपंग बनवले आहे. अभ्यास करताना एखादा मुद्दा अडला, प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले की, Google हा instant, विनासायास उपाय आहे आणि त्यामुळे संदर्भ ग्र॔थ, अवांतर वाचन, सखोल ज्ञान मिळवण्याची जिद्द जवळजवळ संपुष्टात आली आहे. तात्पुरते, कामचलाऊ उत्तर मिळाले ना? बास आता!! हा अभ्यासाचा पॅटर्न बनत चालला आहे!
सुपरफास्ट स्पीडचं वेड लागलेल्या या जगात प्रत्येकजण धावतोय, धावतोय! “वाट पहायला वेळ आहे कुणाकडे?” असा प्रश्न ही पिढी विचारतेय! पण धावण्याच्या या शर्यतीत आयुष्याची, जगण्याची उमेद संपून जातेय. मिळालेल्या यशाचा आनंद उपभोगायलाही वेळ नाही आणि जेव्हा कधीतरी वेळ मिळेल तेव्हा शरीर देत नाही. ही सध्याची जीवनकहाणी !
मंडळी, लहानपणापासूनच, संस्कारक्षम वयातच मुलांना Delayed Gratification चे धडे कृतीतून देणे; slow but steady wins the race या गोष्टी सांगणे; ही मुलांना दिलेली अत्यंत मोलाची देणगी आहे.
काय गंमत होते पहा हं, आपल्याला एकदम उर्मी आलेली असते __ एखादी वस्तू खरेदी करण्याची! आत्ताच्या आत्ता जाऊन ती वस्तू आणूयातच! पण काहीतरी कारणं घडतात आणि ती खरेदी लांबते. पण हा लांबलेला वेळ, आपला मेंदू सत्कारणी लावतो. त्या गोष्टीवर साधकबाधक विचार केला जातो आणि अखेरीस आपण ठरवलेल्या वस्तूपेक्षा चांगली वस्तू खरेदी करतो, किंवा, ती खरेदी टाळून अनाठायी खर्च वाचविला जातो. भावनेच्या भरात, आवेशात घेतलेले निर्णय योग्य ठरतातच असे नाही आणि म्हणूनच निर्णय घेण्यासाठी वेळ देणे, वैचारिक मेंदू Thinking Brain चे ऐकणे, हे खूप महत्वाचे! तरच घेतलेला निर्णय योग्य ठरतो आणि त्याची फलप्राप्ती चांगली होते…..

सर्वांगीण विकास करायचा असेल तर या वाक्यांचा वापर मुलांसाठी करु नका !

सर्वांगीण विकास करायचा असेल तर या वाक्यांचा वापर मुलांसाठी करु नका !

 

प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना चांगलं आणि मजबूत बनवायचं असते. आपल्या मुलांनी कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहिले पाहिजेत या दृष्टीने पालक सतत प्रयत्न करत असतात. मुलांचे भविष्य उज्वल व्हावे हे प्रत्येक पालकाला वाटते. आपली मुले हुशार व्हावीत आणि त्यांच्या सर्वांगीण वाढीकरिता पोषक असे वातावरण राहावे याकरिता पालक प्रयत्नशील असतात. अनेक वेळा पालक मुलांची समजूत काढताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना काही ही वाक्य बोलतात ही वाक्य मुलांच्या मानसिकतेवर ती नकारात्मक परिणाम करू शकतात त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता या वाक्याचा वापर टाळावा. जाणून घेऊया अशी कोणती वाक्य आहेत ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो

१) हे कठीण आहे :-

अनेकदा मुलांच्या बाबतीत असे होते की कुठलीही ही गोष्ट अथवा काम त्यांना कठीण वाटते त्यावेळी आपण पण त्यांना सांगतो ही गोष्ट फार कठीण आहे. लहानपणीच मुलांना जर एखादे काम कठीण आहे. असे थेट सांगितल्यास त्यांची मानसिकता नकारात्मक होऊ लागते आणि मुले कोणत्याही कामाला कठीण स्वरूपात पाहू लागतात. त्यापेक्षा जे कठीण काम आहे त्यावेळी त्यांना हे काम तुझ्याकडून होऊ शकते फक्त अधिक प्रयत्नांची गरज आहे. काहीवेळा अनेक गोष्टी अशा असतात ज्या लहान मुलं करू शकत नाहीत. अशावेळी त्यांना गोष्ट तुला काही काळानंतर येईलच असे समजावल्यास त्यांची मानसिकता ही सकारात्मक बनते. त्यामुळे कधीच कोणतेही काम गोष्ट कठीण आहे असे मुलांना सांगू नका.
२) तुला लागेल :-

लहान पुणे मुले ही फारच साहसी आणि ऊर्जेने भरलेली असतात त्यामुळे ती अशी कामे करू शकतात यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. मात्र अनेकदा पालक मुलांची अति काळजी घेतात. आणि मुलांना करण्यासाठी तुला ही गोष्ट केल्याने तूला लागेल तू पडू शकतो आपण करू शकतो हा त्याचा अर्थ असतो यामुळे मुले कोणतीही क्रिया करताना त्यांच्यातील उत्साह, साहसी वृत्ती गमावून बसतात कारण कोणत्याही क्रियेत ते असुरक्षिततेच्या नजरेने पाहू लागतात. जर तुमचा मुलगा एखादा खेळ खेळत असेल तर स्वच्छंदपणे खेळू द्यावा त्यामधील धोका यावर चर्चा करू नये ज्यामुळे त्याचा उत्साह कमी होईल. तुला लागेल या शब्दामुळे त्याच्या मनात भयाचे वातावरण तयार होते लक्षात ठेवा.
३) हे मी तुझ्यासाठी करत आहे :-

अनेक वेळा असे होते की मुलांना एखादे काम करताना खूप जास्त संघर्ष करावा लागतो. त्यावेळी पालक त्यांचे करून देतात. मुलांची कामात साहाय्यता करणं आणि त्यांचे काम करून देणे यामध्ये बराच फरक असतो. मुलांना काम करताना मदत प्रत्येक पालक करतातच. हे काम करून देतो असे सांगून त्याचे काम पूर्णपणे करून दिल्यास, ती मुले तुमच्यावर अवलंबून राहतात कोणतेही काम जमले नाही तर पालक करून देणार आहेतच अशी त्यांची मानसिकता बनते. आणि मुले काम पूर्ण व्हावे याकरिता अधिक प्रयत्न करत नाहीत. मुलांना कोणत्याही पकामात परिपूर्ण बनवायचे असल्यास त्यांच्यात संघर्ष करण्याची जिद्द निर्माण करावी लागते. ही जिद्द निर्माण करण्यासाठी त्यांना स्वतः हून चुका केल्या तरीही काम करू द्यावे त्यातूनच ते शिकतील हे नक्की.
४) मी हार मानतो :-

लहान मुले मोठ्यांना पाहून अनेक गोष्टी शिकत असतात. जीवन जगताना अनेक बाबतीत आपल्याला अपयश येते. अशावेळी आपण घरात संवाद साधताना मी करू शकलो नाही केव्हा मी हरलो असे वाक्य आपण बोलतो. त्यावेळी मुलांवर त्या वाक्यांचा परिणाम होतो. तुम्ही जर एखाद्या कामात लवकर हार मानत असाल तर मुले तुम्हाला पाहून तुमचे अनुकरण करतात आणि तेही ही अनेक कामात लवकर हार मानतात. लक्षात ठेवा आठ वर्षापर्यंत मुलांची बुद्धी तल्लख असते. लहान वयात ते कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करू शकतात त्यामुळे त्यांनी चांगल्या सवयी आत्मसात केल्यास त्यांचे भविष्य उज्वल असतेच. त्यासाठी तुमच्या सवयी ही बदलाव्या लागतात.

स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय. तेव्हा पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, असा मौलिक सल्ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेच्या सहसंचालक पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी दिला.

– अभय लांजेवार
(लोकमत न्यूज नेटवर्क)

नागपूर : एकीकडे आईवडील जेवणाच्या टेबलवर बसलेले आणि दुसरीकडे मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’. आई तिच्या बाळाला घास भरवते. तोंडासमोर घास आणून ठेवलेला आणि बाळ मोबाईल गेममध्ये मग्न. मध्येच त्याची इच्छा होईल त्यावेळेस त्याला घास भरविला जातो. मग मुलं सातत्याने मोबाईलमध्येच तोंड खुपसतात. कालांतराने त्यांना इतरांच्या भावना समजत नाही. संवेदना संपल्याचाच हा प्रकार वारंवार घडतो. ‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय. तेव्हा मुलांनो ब्ल्यू व्हेल, पबजी यासारख्या जीवघेण्या गेमच्या व्यसनापासून आताच सावध राहा. पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, असा मौलिक सल्ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेच्या सहसंचालक पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखतीच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.
उमरेड येथील रितीक विवेक कोलारकर (१९) तसेच खुशी जगजित परिहार (२०) रा. हिंगणा या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मुलं कुठे भरकटत चालली, असा सवाल करीत यात दोष पालकांचा आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रितीक कोलारकर यास पबजीचे व्यसन जडले होते. त्यानंतर त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचारही केले. मानसोपचार तज्ज्ञांनीही देखरेख केली. त्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शिवाय घामगंड आजारानेही तो त्रस्त होता. यातूनच त्याच्यावर मृत्यू ओढवला. आज गल्लोगल्लीत, घरादारात पबजीचे वेड लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक व्याधीही पुढे येत आहेत. उमरेडच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाल्याचे चित्र आहे.
अलीकडे दोन तीन वर्षांच्या मुलांनाही अगदी बिनधास्त मोबाईल दिला जातो. अशावेळी आमची मुलं-मुली किती स्मार्ट आहेत. त्याचे तोंडभरून कौतुक केले जाते. इतक्या लहान वयात टीव्हीसमोर, तासन्तास मुलांच्या हातात मोबाईल देणे या बाबी घातक आहेत. मी तंत्रज्ञानास वाईट म्हणत नाही. त्याचा उपयोग कसा करता, हे महत्त्वाचं आहे, अशी मौलिक बाबही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितली.

‘गेम’चे व्यसन महाभयंकर
चित्रपटासारखं आयुष्य सुपरफास्ट नसतं. यामुळे आपली मुलं नेमकी काय करीत आहेत, काय बघत आहेत, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सतत मोबाईलमध्येच डोकं खुपसत राहिल्यामुळे मेंदू बधिर होतो. आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. दुसऱ्यांच्या भावनाही समजत नाही, ही बाब अत्यंत धोकादायक आहे. मग खाण्यात, खेळण्यात आणि शिक्षणात आपसुकच दुर्लक्ष होतं. दारू आणि ड्रग्जपेक्षाही पबजी, ब्ल्यू व्हेलसारख्या मोबाईल गेमचे हे महाभयंकर ‘व्यसन’ आहे.

ही कम्युनिकेशन गॅप
खुशी परिहार ही मुलगी घर सोडून गेली. काय केलं पालकांनी? मुलांवर धाक नको का? संवाद पाहिजे. अशावेळी आई-वडिलांनी चर्चा करायला पाहिजे. संवादाला वेळच नाही. ही जनरेशन गॅप नाही. कम्युनिकेशन गॅप आहे. शाळा-कॉलेजमध्ये पाठवलं. शिकवणी वर्ग लावून दिले की जबाबदारी संपली. मुलांसाठी वेळ काढा. त्यांच्या गरजा समजून घ्या. ‘मागेल ते द्यायचं’ असे लाड पुरविले गेले की मग त्या मुलांना त्याच सवयी लागतात. एखाद्या प्रेमात नकार दिला की ते पचविण्याची ताकद नसते. मग हत्या नाही तर आत्महत्या घडतात. आपण समाज म्हणून आणि पालक म्हणून कमी पडत आहोत, अशीही वास्तविकता त्यांनी व्यक्त केली.

योग्यवेळी उपचार
हे व्यसन सोडविण्यासाठी योग्यवेळी उपचार महत्त्वाचे आहेत. निदान मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले पाहिजे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उपचारासोबतच पुन्हा चर्चा, संवाद, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पर्यायी इतर साधने उपलब्ध आहेत, याची जाणीव करून द्या. हे व्यसन आहे. पालकांच्या बसची बात नाही. कितीही सांगितलं तरी समस्या सुटणार नाही. त्यांना सायक्रॅटिक कौन्सिलिंग आणि डी-अ‍ॅडिक्शन थेरपी देणे गरजेचे आहे, अशीही बाब डॉ. बंग यांनी मांडली.

http://bit.ly/2YSLfCr

“आपण अभ्यासात हुशार नाही!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!” विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाही..मी मठ्ठ आहे.. इत्यादी.

असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजवूून घेऊ.

“गोबल्स” नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही.

लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे.

तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’

वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने २४०० वर्षापूर्वी म्हणाले, “माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे.

लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या गु्रपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या गु्रपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही.

मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिक्षक रुजू होतील तेव्हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने हुशार बनायला सुरुवात होतील.. त्यांना असं वाटणार नाही की मी विसरभोळे आहे.

संस्कार

संस्कार

लहान मुलं, तारुण्यात येणारी मुलं किंवा अगदीच सर्वच वयोगटातील माणसं यांच्यावर भले किंवा चांगले संस्कार होण्यासाठी एकूणच देशभरात अनेक प्रकारच्या गोष्टींचा, प्रयोगांचा सततचा मारा चहुबाजूंनी सुरू असलेला दिसतो. मुळात संस्कार म्हणजे काय? तर ज्या गोष्टी चांगल्या, मानवी मुल्य जपणाऱ्या असतात त्या. लहान मुलांवर संस्कार चांगले व्हावेत याचा ठेका जणू तमाम पालक, शिक्षक, नातेवाईक यांच्याकडेच दिलेला असतो. आणि ते मग आपापल्या परिनं गोड बोलून, समज देऊन, प्रसंगी मारझोड करून पोरांना संस्कार शिकवण्याचा आटापिटाही करत राहतात. अगदीच दमछाक होईपर्यंत. तरीसुद्धा पोरांना जे करायचं ते करतही राहतात. मला नेहमी प्रश्न पडतो, एकूणच देशातल्या प्रत्येक नागरीकावर त्यांच्या लहानपणापासून अनेक चांगले संस्कार शिकवले गेलेले असताना सुद्धा देशात वाईटपणा, भ्रष्टाचार, चोऱ्या, व्याभिचार, बलात्कार, खुन, भांडणं यासारख्या वाईट गोष्टी सुरूच आहेत किंवा त्या थांबायचं नाव घेत नाहीत. कारण, काय असावं? तर अगदी साधं उत्तर आहे. संस्कार ही देण्याची नव्हे, घेण्याची गोष्ट आहे. मग भले ते तुम्ही समोरच्या माणसाला कशाही प्रकारे शिकवण्याचा किंवा लादण्याचा प्रयोग करा. समोरचा माणूस त्याला पाहिजे तसंच तो जगणार असतो. माझा बहुतेकदा पालकांशी संपर्क येतो. एक पालक तोंडात तंबाखू टाकत म्हणाले,
आमचं पोरगं नको म्हटलं, तरीसुद्धा अमूक अमूक एखादी वाईट गोष्ट करतंच. हल्ली तर गुटखाही खायला लागलंय. सगळे भले-बुरे उपाय करून झालेत. तुम्ही सांगा काय करावं?
मी चिडून म्हणालो, जी गोष्ट तुम्ही स्वतः इतक्या आवडीने खाता, तीच गोष्ट तुमच्या मुलानं खाल्ली तर त्यात वाईट ते काय? मुळात पालक म्हणून तुम्ही स्वतः किती संस्कारक्षम आहात याचा विचार कधी केलायं काय? त्यामुळे त्याला जे करायचंय ते करू द्या. बिघडला तर बिघडू द्या. तो आणि त्याचं कर्म.
साधी गोष्ट आहे. नेहमी खरे बोलावे हा सुविचार, मुल्य आपण सगळेच शाळेय वयापासून शिकलेलो आहोत. तरीसुद्धा आपण उभ्या आयुष्यात कितीवेळा खरे बोलतो? असा प्रश्न स्वतःलाच एकदा विचार पहा. म्हणजे लक्षात येईल दुसऱ्यांना संस्काराची भाषा शिकवणं योग्ययं कि अयोग्य? जे संस्कार आपणच कधी घेतले नाहीत ते आपल्या मुलांना शिकवण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि मुलांनी ते अंगीकारावेत याची अपेक्षा तरी कशी बाळगायची?
दिवसातून ४ वेळा तंबाखू खाणारा माणूस स्वतःच्या मुलांकडून र्निव्यसनी राहण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो? आपण आपल्या तारुण्यात दिसेल त्या पोरींवर लाईनी मारायच्या, एखादी पोरगी पटावी म्हणून जीवाची घालमेल करून घ्यायची आणि कधीतरी आपण म्हातारे झाल्यावर आपल्या ऐन तारुण्यात आलेल्या पोरांनी मात्र तसलं काही न करता सज्जनपणे जगायचं ही भलतीच अपेक्षा नाही काय? पोरांनी लाईनी मारल्या तर त्याला वाईट म्हणायचं. मात्र आपण केलं तर रितीप्रमाणे म्हणायचं. हा दुजाभाव कशाला?
म्हणून मला वाटतं, पोरांना संस्कार वगैरे शिकवण्याच्या फंदात न पडता, पालक, शिक्षक म्हणून आपणच आधी निट, सरळमार्गी जगण्याचा प्रयत्न करूत. आपापल्या तत्वांवर ठामपणा ठेवूत. पोरांना आपल्याकडे बघून जेवढं चांगलं घेता येईल तेवढं ते घेतील. बाकी गोष्टींना पर्याय नाही. कारण, घराबाहेरील जगातून देखिल पोरं काहीतरी भलं- बुरं शिकणारचं असतात. आईबाप म्हणून आपण पोरांच्या किती किती गोष्टींवर बंधनं आणणार?
आता मी माझ्या घरातील गमंत सांगतो. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही पुस्तकं वाचण्याचा नाद आहे. आमच्या घरात हजारांहून जास्त पुस्तकं आहेत. छोटं ग्रंथालय आहे. आम्हाला १० वर्षाचं एक पोरंगयं. तर आम्ही त्याला पुस्तकं वगैरे वाच असं आजतागायत सांगितलेलं नाही. नि सांगणारही नाही. पण प्रत्येक महिण्याला शे – दोनशेची लहान मुलांची पुस्तकं आम्ही बाजारातून नित्यनियमाने आणतही असतो. जमेल तसं त्याच्या समोर बसुन वाचत असतो. आता वाढत्या वयानुसार पोराला समजलंच की, आईबाप जे वाचतात ते आपणही वाचू तर वाचेल की तो. त्याकरीता त्याच्यावर जबरदस्ती कशाला?
शेवटी महत्वाचं सांगतो, मुलं वाढवताना त्यांचे पालक (पालनपोषण करणारेच)व्हा. जन्मदाते व्हायला गेलात की, मग सगळा मामला बिघडतो. मला काय म्हणायंचय, ते कळलं असेलच तुम्हाला? आँ???

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

1 तारे जमीन पर
2 एलिझाबेथ एकादशी
3 प्रकाश बाबा आमटे
4 टपाल
5 श्वास
6 कराटे किड
7 कुंग फ़ू पांडा
8 राजमाता जिजाऊ
9 रमाबाई भिमराव आंबेडकर
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
11 भाग मिल्खा भाग
12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय
14 होम
15 यलो
16 चिलर पार्टी
17 द किड
18 होम अलोन
19 तानी
20 सिंड्रेला
21 बेबीज डे आऊट
22 ज जंतरम म मंतरम
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
25 वनपुरुष
26 दहावी फ़
27 बभागो भूत आया
28 Two sollutions
29 twenty thousand leagues
30 under the sea
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया
33 शाळा
34 राजुचाचा
35 किंग अंकल
36 दोस्ती (हिंदी)
40 3 इडियटस
41 चल चले
42 चकोरी
43 चिंटू
44 चिंगी
45 I am Kalam
46 Park
47 graviti
48 jurasic world
49 सिंधूताई सपकाळ
50 castaway 51 भगतसिंग
52 चिमनी पाखरं
53 the berning train
54 Harry potter 55 mountain man
56 शिक्षणाच्या आईचा..
57 लोकमान्य
58 विटी दांडू
59 आक्टोबर स्काय
60 मासूम
61 क्रिश
62 एक डाव भुताचा,
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away – Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro – Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age – 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free
81 Inside out
82 Madagascar
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six,
92 rio
93 Karate kid
94 Home alone….
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi,
100 blue umbrella,
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug’s Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

“मुलानेच घेतली बापाची शाळा”

(वयात आलेल्या सगळ्या आई – बाबांसाठी)
– योगेश गोखले

सो S S बाबा chill , असं म्हणून माझ्याच खांद्यावर थोपटून मुलगा बाहेर पडला. मी अजूनही कन्फ्युज्ड आहे.

माझा मुलगा यंदा १०वी ला आहे. तसा बऱ्यापैकी हुशार आहे. आजच सकाळी त्याचा प्रिलिम चा रिझल्ट लागला. आम्ही दोघे उभयता शाळेच्या बोलावण्यावरून पालक मिटिंग ला गेलो होतो. आमच्या मुलाचा रिझल्ट आमच्या कडे दिला (हल्ली मुलांकडे रिझल्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, का मुलं फेरफार करतात , का घरी दाखवतच नाहीत , काय माहित ? पण आजकाल पालकांना बोलावून रिझल्ट द्यायची नवी पद्धत आहे ) आणि मग सगळ्या पालकांची “पेरेंट मिटिंग” झाली. मुलाला ८४% मिळाले होते. (पण हल्ली त्याने काय होतंय?).

क्लास टिचर ने सांगितलं की सगळ्याच मुलांना तसे कमी मार्क मिळाले आहेत. त्यामुळे आता पुढचे दोन महिने सगळ्यांनी माना मोडून , दिवसाचे १८ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांनी अभ्यास कसा करावा , पालकांनी काय काळजी घ्यावी , मुलांना आहार काय दयावा, वगैरे वगैरे मार्गदर्शन झालं. मग प्रत्येक विषयाच्या टिचरनी अर्धा तासाचं सेशन घेतलं. प्रत्येकाने सांगितलं की सकाळी २, संध्याकाळी २ असा रोज त्यांच्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी क्लास टिचर ने परत अर्धा तास घेतला. हे ही सांगितलं की आम्ही मुद्दाम प्रिलिम चे पेपर खूप अवघड काढतो आणि तपासतोही खूप स्ट्रीक्ट. मुलांना कमी मार्क पडले की ती अजून अभ्यास करतात . आमच्या शाळेचा रिझल्ट कसा दर वर्षी १००% लागतो वगैरे.

आम्ही टिपिकल ओपन कॅटेगरी मध्यम वर्गीय असल्यामुळे लगेच हे सगळं सिन्सीयरली घेतलं. सौ ने सांगितलं की मी नेहमी त्याला सांगतच असते. तुम्ही जरा ओरडा. बाबांच्या सांगण्याने जरा वजन पडतं.
मी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर चहा घेतला. चिरंजीव फुटबॉल खेळायला जायच्या तयारीत होते. मीच विषय काढला,

“काय , किती मार्क मिळाले?”

“तुम्हालातर माहित आहेत की”

“अरे पण मग कमी पडले , ८४% नी आजकाल कुठे काय होतं. हवं ते कॉलेज सोड , सायन्स ला पण ऍडमिशन मिळणार नाही. कमीत कमी ९४% तरी पडायला हवेत तर काहीतरी खरं”

तो नुसता हसला. मला त्याच्या या हसण्याची फार चीड येते. ते कुत्सीत च्याही पलीकडचे आहे असं मला वाटतं. स्वाभाविक , मी त्याला जरा मोठ्या आवाजात विचारलं

“काय म्हणतोय मी …हसण्यासारख काय आहे त्यात?”

“नाही बाबा मला गंम्मत वाटते की तुम्ही परस्परच ठरवलं की मी सायन्स ला जाणार आहे… म्हणून हसलो”

मला त्यानी बरोब्बर पकडलं होतं ..पण मी मोठा होतो ना ..त्याच अधिकाराने मी दरडावून सांगितलं

“प्रश्न तो नाही आहे ..आधी ९४% टक्के तर मिळवून दाखव ..मग पुढे काय शिकायचं ते बघू ”

“हा ..ते मिळतील ..९२% – ९४% मिळतील”

“अरे पण कसे ?..तू ८४% वरून ९४% ला कसा जाणार आहेस ? हे खेळणं वगैरे कमी करा आता ..जरा टेस्ट सिरीज लावा ..वेळ लावून पेपर सोडवा”

“बाबा chill ..मिळतील ९२%+”

“अरे गाढवा ते काय वरून पडणार आहेत का ..chill करून चालणार नाही तुला”

“बाबा ..जरा मोबाईल द्या तुमचा”

त्याने माझा मोबाईल घेतला आणि त्याच्या ई-मेल मधून एक excel ओपन करून दाखवली. त्यात त्याच्या शाळेतील गेल्या ३ वर्षातल्या मुलांचा डेटा होता ..प्रत्येकाला पडलेले प्रिलिम चे मार्क आणि फायनल बोर्डाचे मार्क्स. स्पष्ट ट्रेंड होता की ऑन अन एव्हरेज ८ ते १० टक्के वाढतात.

“बाबा तुमच्या पेक्षा आमचं नेटवर्क आणि इंटेलिजन्स जास्त स्ट्रॉंग आहे, शाळा मुद्दामच पेपर अवघड काढते आणि कडक तपासते , जेणे करून मुलांना आणि त्याही पेक्षा पालकांना वाटावं की अजून खूप अभ्यास करायला पाहिजे. हे तुम्हालाही आज शाळेत सांगितलं असेल पण तुम्ही पण तसं काही सांगणार नाही. मला खरंच कळत नाही इतर वेळेस तुम्ही आम्हाला जे trust आणि transparency वर लेक्चर देता ते आमच्या अभ्यासाच्या वेळी कुठे जातं. जर मुलांना रिऍलिस्टीक मार्क दिले तर मुलं काय हुरळून जाणार आहेत का ? उलट चांगले मार्क टिकवायचं टेन्शन जास्त असतं या कॉम्पिटेटिव्ह जगात. आणि प्रत्येकाला वाटतंच ना की मागच्या पेक्षा चांगलं करावं . मग रिऍलिस्टिक मार्क्स दिले तर बिघडलं कुठे ? प्रत्येक विषयाचा जर रोज ४ तास अभ्यास करायचा तर २४ तास अभ्यास झाला. कोणीतरी जरा लॉजिकल सांगायला पाहिजे ना ..मग खरं मोटिवेशन येईल नाहीतर हे सगळं फार डिप्रेसिंग आहे”

“आहो माझं ठीक आहे ..मला खात्री आहे की मी ९२% पर्यंत कसाही जाईन …पण मला काळजी निशित ची आहे. खरं तर तो ८०%-८२% पर्यंत जाईलही. त्याने प्रिलिम ला भरपूर अभ्यास केला होता. मीच त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. पण या अवघड पेपर आणि आतिकडक तपासणीच्या नादात त्याला ६०% मिळाले. गेले २ दिवस डिप्रेस आहे. आता अभ्यासच करणार नाही म्हणतो कारण म्हणे मी काही बाकीच्यांसारखा हुशार नाही ..कितीही अभ्यास केला तरी ६०%. आई -बाबा पण खूप ओरडले त्याला. सहामाही ला ७०% वरून ६०% वर आला. लायकी काढली त्याची.”

“त्याच्या कडेच चाललोय फुटबॉल खेळायला.. हाच आता एक मार्ग आहे की त्याला या डिप्रेशन मधून बाहेर काढून परत अभ्यासाला लावण्याचा..अर्धा तास खेळणार आणि मग त्याच्या नकळत आज सायन्स चं काय वाचलं , काय डोक्यावरून गेलं ..काय कसं लक्षात ठेवलं ह्या गप्पा मारणार, म्हणजे माझी रिव्हिजन आणि त्याची नकळत तयारी…८-१० दिवसात त्याला पेपर सोडवायला लावतो..आमची आळी – मिळी गूप चळी. मीच तपासून रिऍलिस्टिक मार्क देणार. नाही त्याला ८०% + नेला तर नाव दुसरं”

“आणि माझी काळजी करू नका , मी तुम्हाला ९२%+ ची गॅरेंटी देतो. पण त्या पुढच्या २% साठी उगाच माझ्या मागे लागू नका. मी मनापासून प्रयत्न करीन पण त्या ऍडीशनल २% ची काही गॅरंटी नाही आणि उगाच त्या खात्री नसलेल्या गोष्टी साठी मला माझा संध्याकाळचा खेळ , तबल्याचा क्लास , मित्र बंद करायचे नाही आहेत. या जगात मध्यमवर्ग नामोशेष होत चालला आहे. तोच तर एक वर्ग होता ज्याने सगळं बॅलेन्स ठेवलं होतं, इन्कलुडींग सहिष्णुता आणि संस्कृती. ऑल इसम्स आर गुड आदर दॅन एक्सट्रीझम. एक्सट्रीझम दहशदवादाला जन्म देतो. मार्कांचेही तेच झालेय, अतिरेकी मार्क पाहिजेत .. ‘९८%’ नाहीतर मग ‘पास झाला तरी बास’ कॅटेगरी. हा पण एक दहशवादच नाही का ? ८०%-९०% मार्क , खेळ , मित्र , छंद , तबला-गाणं -नाटकं अशी मध्यममार्गी मुलं नकोच आहेत कुणाला. एक तर IIT नाहीतर ITI. खरंच अवघड आहे. अरे TII पण असू शकत ना..

अजूनही माझ्यातला बाप जागा होता. मी त्याला दरडावून विचारले

“तुला काय म्हणायच आहे ..आम्ही दहशदवादी आहोत का ? का आम्ही तुला दहशदवादी करतोय”

तो परत एकदा तसा हसला ..कुत्सित च्या पलीकडचा.

“बाबा प्रश्न माझा नाही आहे , शाळा आणि सुज्ञ पालक त्या निशित ला दहशदवादी करायला निघाले आहेत आणि कोणीतरी, म्हणजे मी, हे थांबवलेच पाहिजे”

“पण बाबा तुम्ही माझी काळजी करू नका – ९२% नक्की मिळवतो …chill”

“चला मी निशित कडे जावून तासाभरात येतो ..आल्यावर मॅथ्स चा पेपर सोडवायचाय”

माझ्याही नकळत मी उठलो आणि बोलून गेलो “मी पण येऊ का फुटबॉल खेळायला ?”

मुलाने येऊन मला खांद्यावर थोपटले .. “बाबा chill ..तुला झेपणार नाही”

“ए आई बाबासाठी एक कप आल्याचा चहा टाक”

तो बाय करून हसत गेला सुद्धा.

तो निशितला ८०% पर्यंत आणायला गेलाय. त्याने ९२% मिळवले आणि निशितला ८०% मिळाले तर माझ्या दृष्टीने ते १००% ठरतील हे नक्की !

गेमिंग

गेमिंग करणार्या मुलांचे पालक भेटले की हमखास म्हणतात आमचा मुलगा/ मुलगी अगदी एडिक्ट झाली आहे..

मुलांच्या अति मोबाईल वापरासाठी किंवा स्क्रीन टाइमसाठी त्यांना दोषी ठरवू नका. त्यांच्या नावाने कटकट करण्याआधी ही सवय कुणी लावली ते आठवून बघा. दोष कुणाला द्यायचाच झाला तर स्वतःला द्यायला हवा. माझी मुलगी/मुलगा मोबाईल एडिक्ट आहे हे वाक्य चूक आहे. हे वाक्य असं वापरून पालक म्हणून आपण स्वतःची सुटका करून घेतो आपल्याही नकळत. काहीवेळा जे म्हणायचंय तेच शब्दप्रयोग आवश्यक आहे. पालक म्हणून आपण सोयीच्या गोष्टी करतो आणि मुलांना व्यसनाधीन म्हणतो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. बाजारात जाऊन महागडी गॅजेट्स, मोबाईल, टॅब मुलं विकत आणत नाहीत. आपण घेऊन देतो, त्याचं कौतुक असतं आपल्याला, आपल्या आर्थिक क्षमतेचा गर्व, अभिमान आणि काय काय ही असतं. सुप्त मानसिक अवस्थेत. परिणाम मुलांना सवयी लागतात.
दुसरं बऱ्याच पालकांना वाटतं मोबाईल काढून घ्यायचा तर इतर महागडे पर्याय दिले पाहिजेत. तर मुळीच नाही. उलट एक रुपया ही खर्च न करता मुलांना असंख्य गोष्टींमध्ये गुंतवता येऊ शकतं. त्यांना स्वयंपाक घरात मदतीला घ्या. पाटपाणी घ्यायला सांगा. त्यांना कपड्यांच्या घड्या करायला शिकवा. त्यांना भाज्या निवडायला शिकवा. त्यांच्याशी तुम्ही खेळा. घरातल्या आवरा आवरीत मदतीला घ्या. त्यांची खेळणी स्वच्छ करायला, आवरून ठेवायला सांगा.
किंवा काहीही पर्याय देऊ नका.
तुझा तू शोध असं सांगा.
मुलं मोबाईल मिळाला नाही, टिव्हीही मिळाला नाही तर त्यांचे म्हणून पर्याय शोधतात. त्यांना ते कसे शोधायचं हे माहीत असतं. काहीच सापडलं नाही तर इतर मुलांशी जास्तवेळ खेळतात. प्रॉब्लेम आपला म्हणजे पालकांचा असतो. आपल्याला सगळं भरवायला आवडतं. त्यांनी काय करायचं, कसं करायचं, निराळे पर्याय कसे निवडायचे, कुठले निवडायचे सगळं आपण ठरवतो आणि बरहुकूम मुलांना करायला लावतो. त्यापेक्षा पर्याय द्या, त्यांना आवडले तर ठीक नाही आवडले तर त्यांचे त्यांना शोधू द्या..
स्पून फिडिंग बंद करणं ही पालकांसाठी सगळ्यात कठीण गोष्ट असते. कारण त्याचं व्यसन असतं पालकांना.
मुलं एडिक्ट नसतात, पालक असतात, वेगवेगळ्या गोष्टींचे.
एक रुपयाही खर्च न करता, कुठलंही नवं खेळणं विकत न आणता मुलांना मोबाईल पासून दूर नेता येतं… जस्ट थिंक!

मुक्ता चैतन्य

#noscreenday #arunsadhufellowship #socialmedia #noscreenforkids