Back to Top

Author Archives: swarda

सर्वांगीण विकास करायचा असेल तर या वाक्यांचा वापर मुलांसाठी करु नका !

सर्वांगीण विकास करायचा असेल तर या वाक्यांचा वापर मुलांसाठी करु नका !

 

प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांना चांगलं आणि मजबूत बनवायचं असते. आपल्या मुलांनी कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहिले पाहिजेत या दृष्टीने पालक सतत प्रयत्न करत असतात. मुलांचे भविष्य उज्वल व्हावे हे प्रत्येक पालकाला वाटते. आपली मुले हुशार व्हावीत आणि त्यांच्या सर्वांगीण वाढीकरिता पोषक असे वातावरण राहावे याकरिता पालक प्रयत्नशील असतात. अनेक वेळा पालक मुलांची समजूत काढताना किंवा त्यांच्याशी संवाद साधताना काही ही वाक्य बोलतात ही वाक्य मुलांच्या मानसिकतेवर ती नकारात्मक परिणाम करू शकतात त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता या वाक्याचा वापर टाळावा. जाणून घेऊया अशी कोणती वाक्य आहेत ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो

१) हे कठीण आहे :-

अनेकदा मुलांच्या बाबतीत असे होते की कुठलीही ही गोष्ट अथवा काम त्यांना कठीण वाटते त्यावेळी आपण पण त्यांना सांगतो ही गोष्ट फार कठीण आहे. लहानपणीच मुलांना जर एखादे काम कठीण आहे. असे थेट सांगितल्यास त्यांची मानसिकता नकारात्मक होऊ लागते आणि मुले कोणत्याही कामाला कठीण स्वरूपात पाहू लागतात. त्यापेक्षा जे कठीण काम आहे त्यावेळी त्यांना हे काम तुझ्याकडून होऊ शकते फक्त अधिक प्रयत्नांची गरज आहे. काहीवेळा अनेक गोष्टी अशा असतात ज्या लहान मुलं करू शकत नाहीत. अशावेळी त्यांना गोष्ट तुला काही काळानंतर येईलच असे समजावल्यास त्यांची मानसिकता ही सकारात्मक बनते. त्यामुळे कधीच कोणतेही काम गोष्ट कठीण आहे असे मुलांना सांगू नका.
२) तुला लागेल :-

लहान पुणे मुले ही फारच साहसी आणि ऊर्जेने भरलेली असतात त्यामुळे ती अशी कामे करू शकतात यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. मात्र अनेकदा पालक मुलांची अति काळजी घेतात. आणि मुलांना करण्यासाठी तुला ही गोष्ट केल्याने तूला लागेल तू पडू शकतो आपण करू शकतो हा त्याचा अर्थ असतो यामुळे मुले कोणतीही क्रिया करताना त्यांच्यातील उत्साह, साहसी वृत्ती गमावून बसतात कारण कोणत्याही क्रियेत ते असुरक्षिततेच्या नजरेने पाहू लागतात. जर तुमचा मुलगा एखादा खेळ खेळत असेल तर स्वच्छंदपणे खेळू द्यावा त्यामधील धोका यावर चर्चा करू नये ज्यामुळे त्याचा उत्साह कमी होईल. तुला लागेल या शब्दामुळे त्याच्या मनात भयाचे वातावरण तयार होते लक्षात ठेवा.
३) हे मी तुझ्यासाठी करत आहे :-

अनेक वेळा असे होते की मुलांना एखादे काम करताना खूप जास्त संघर्ष करावा लागतो. त्यावेळी पालक त्यांचे करून देतात. मुलांची कामात साहाय्यता करणं आणि त्यांचे काम करून देणे यामध्ये बराच फरक असतो. मुलांना काम करताना मदत प्रत्येक पालक करतातच. हे काम करून देतो असे सांगून त्याचे काम पूर्णपणे करून दिल्यास, ती मुले तुमच्यावर अवलंबून राहतात कोणतेही काम जमले नाही तर पालक करून देणार आहेतच अशी त्यांची मानसिकता बनते. आणि मुले काम पूर्ण व्हावे याकरिता अधिक प्रयत्न करत नाहीत. मुलांना कोणत्याही पकामात परिपूर्ण बनवायचे असल्यास त्यांच्यात संघर्ष करण्याची जिद्द निर्माण करावी लागते. ही जिद्द निर्माण करण्यासाठी त्यांना स्वतः हून चुका केल्या तरीही काम करू द्यावे त्यातूनच ते शिकतील हे नक्की.
४) मी हार मानतो :-

लहान मुले मोठ्यांना पाहून अनेक गोष्टी शिकत असतात. जीवन जगताना अनेक बाबतीत आपल्याला अपयश येते. अशावेळी आपण घरात संवाद साधताना मी करू शकलो नाही केव्हा मी हरलो असे वाक्य आपण बोलतो. त्यावेळी मुलांवर त्या वाक्यांचा परिणाम होतो. तुम्ही जर एखाद्या कामात लवकर हार मानत असाल तर मुले तुम्हाला पाहून तुमचे अनुकरण करतात आणि तेही ही अनेक कामात लवकर हार मानतात. लक्षात ठेवा आठ वर्षापर्यंत मुलांची बुद्धी तल्लख असते. लहान वयात ते कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करू शकतात त्यामुळे त्यांनी चांगल्या सवयी आत्मसात केल्यास त्यांचे भविष्य उज्वल असतेच. त्यासाठी तुमच्या सवयी ही बदलाव्या लागतात.

स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय!

‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय. तेव्हा पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, असा मौलिक सल्ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेच्या सहसंचालक पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी दिला.

– अभय लांजेवार
(लोकमत न्यूज नेटवर्क)

नागपूर : एकीकडे आईवडील जेवणाच्या टेबलवर बसलेले आणि दुसरीकडे मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’. आई तिच्या बाळाला घास भरवते. तोंडासमोर घास आणून ठेवलेला आणि बाळ मोबाईल गेममध्ये मग्न. मध्येच त्याची इच्छा होईल त्यावेळेस त्याला घास भरविला जातो. मग मुलं सातत्याने मोबाईलमध्येच तोंड खुपसतात. कालांतराने त्यांना इतरांच्या भावना समजत नाही. संवेदना संपल्याचाच हा प्रकार वारंवार घडतो. ‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चाललाय. तेव्हा मुलांनो ब्ल्यू व्हेल, पबजी यासारख्या जीवघेण्या गेमच्या व्यसनापासून आताच सावध राहा. पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, असा मौलिक सल्ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेच्या सहसंचालक पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी दिला. प्रस्तुत प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखतीच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.
उमरेड येथील रितीक विवेक कोलारकर (१९) तसेच खुशी जगजित परिहार (२०) रा. हिंगणा या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मुलं कुठे भरकटत चालली, असा सवाल करीत यात दोष पालकांचा आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रितीक कोलारकर यास पबजीचे व्यसन जडले होते. त्यानंतर त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचारही केले. मानसोपचार तज्ज्ञांनीही देखरेख केली. त्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शिवाय घामगंड आजारानेही तो त्रस्त होता. यातूनच त्याच्यावर मृत्यू ओढवला. आज गल्लोगल्लीत, घरादारात पबजीचे वेड लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक व्याधीही पुढे येत आहेत. उमरेडच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाल्याचे चित्र आहे.
अलीकडे दोन तीन वर्षांच्या मुलांनाही अगदी बिनधास्त मोबाईल दिला जातो. अशावेळी आमची मुलं-मुली किती स्मार्ट आहेत. त्याचे तोंडभरून कौतुक केले जाते. इतक्या लहान वयात टीव्हीसमोर, तासन्तास मुलांच्या हातात मोबाईल देणे या बाबी घातक आहेत. मी तंत्रज्ञानास वाईट म्हणत नाही. त्याचा उपयोग कसा करता, हे महत्त्वाचं आहे, अशी मौलिक बाबही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितली.

‘गेम’चे व्यसन महाभयंकर
चित्रपटासारखं आयुष्य सुपरफास्ट नसतं. यामुळे आपली मुलं नेमकी काय करीत आहेत, काय बघत आहेत, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सतत मोबाईलमध्येच डोकं खुपसत राहिल्यामुळे मेंदू बधिर होतो. आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. दुसऱ्यांच्या भावनाही समजत नाही, ही बाब अत्यंत धोकादायक आहे. मग खाण्यात, खेळण्यात आणि शिक्षणात आपसुकच दुर्लक्ष होतं. दारू आणि ड्रग्जपेक्षाही पबजी, ब्ल्यू व्हेलसारख्या मोबाईल गेमचे हे महाभयंकर ‘व्यसन’ आहे.

ही कम्युनिकेशन गॅप
खुशी परिहार ही मुलगी घर सोडून गेली. काय केलं पालकांनी? मुलांवर धाक नको का? संवाद पाहिजे. अशावेळी आई-वडिलांनी चर्चा करायला पाहिजे. संवादाला वेळच नाही. ही जनरेशन गॅप नाही. कम्युनिकेशन गॅप आहे. शाळा-कॉलेजमध्ये पाठवलं. शिकवणी वर्ग लावून दिले की जबाबदारी संपली. मुलांसाठी वेळ काढा. त्यांच्या गरजा समजून घ्या. ‘मागेल ते द्यायचं’ असे लाड पुरविले गेले की मग त्या मुलांना त्याच सवयी लागतात. एखाद्या प्रेमात नकार दिला की ते पचविण्याची ताकद नसते. मग हत्या नाही तर आत्महत्या घडतात. आपण समाज म्हणून आणि पालक म्हणून कमी पडत आहोत, अशीही वास्तविकता त्यांनी व्यक्त केली.

योग्यवेळी उपचार
हे व्यसन सोडविण्यासाठी योग्यवेळी उपचार महत्त्वाचे आहेत. निदान मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले पाहिजे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उपचारासोबतच पुन्हा चर्चा, संवाद, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पर्यायी इतर साधने उपलब्ध आहेत, याची जाणीव करून द्या. हे व्यसन आहे. पालकांच्या बसची बात नाही. कितीही सांगितलं तरी समस्या सुटणार नाही. त्यांना सायक्रॅटिक कौन्सिलिंग आणि डी-अ‍ॅडिक्शन थेरपी देणे गरजेचे आहे, अशीही बाब डॉ. बंग यांनी मांडली.

http://bit.ly/2YSLfCr

खेळणं

खेळणं

लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. खेळण्यांशी मुलं खूप आनंदाने खेळतात अशी सर्वसाधारण समजूत आहे. परंतु बहुतांश मुलं अशी असतात की ज्यांना विकत आणलेली खेळणी आवडतातच असं नाही, तर मोठी माणसं ज्या ज्या वस्तू हाताळतात, त्या वस्तूंशी ते जास्त काळ घालवतात. त्या सर्व वस्तू मुलांना हव्या असतात आणि हे नैसर्गिक आहे. अतिशय हौसेने आणलेल्या महागडय़ा खेळण्यांकडे अनेकदा मुलं ढुंकूनही पाहत नाहीत आणि त्याऐवजी आई-बाबांच्या हातातला मोबाइल मुलांना जास्त हवाहवासा वाटतो.

मुलांच्या मेंदूचा विचार केला तर त्यांच्यासाठी कोणतीही वस्तू ही वस्तूच असते. ‘खास आपल्यासाठी तयार केलेलं खेळणं’ असं काही नसतं. एखादी वस्तू रंगीबेरंगी दिसते, वाजते, हलते, पुढे सरकते, झोके घेते, गाते, नाचते, म्हणून मुलं काही काळ त्याच्यामध्ये रमतात. परंतु त्यांच्या दृष्टीने घरातलं लाटणं, पोळपाट, चपला, मोबाइल, लॅपटॉप, गरगर फिरणारा पंखा आणि खेळण्यातल्या ससा-बाहुल्या हे सर्व सुरुवातीच्या काळात तरी सारखंच असतात. मुलांना चेंडू खेळायला विशेष आवडतो. कारण तो सतत हालचाल करत असतो.

वयाच्या याच टप्प्यावर मुलांच्या हातात अत्यंत घातक पद्धतीने मोबाइल दिला जातो. लहानगी मुलंही त्यात गुंततात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ते त्यातली चित्रं हलती असतात. त्याला वेग असतो. ते रंगीत-संगीत असतं. मात्र मोबाइल हे मुलांचं खेळणं कोणत्याही परिस्थितीत असू शकत नाही.

मुलांच्या हातात खेळणी दिलीच नाहीत तरी ती नक्कीच स्वत:च्या डोक्याने काही तरी शोधून काढतात. प्रकाश नारायण संत यांच्या कथेत मुलांनी एका पडक्या घराच्या मोडलेल्या दरवाजाचं खेळणं म्हणून वापर केला होता आणि त्यांचे काही दिवस त्या दरवाजाशी विविध प्रकारे खेळण्यात गेले होते. त्यात स्वत:च्या कल्पना वापरून मजा घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं. लहान मुलं-मुली अशाच प्रकारे टाळ्यांचे भरपूर खेळ आणि त्यावरची असंबद्ध गाणी शोधून काढतात. स्वत:ला छान रमवतात. एकामागोमाग कितीही वेळ खेळू शकतात. कमीत कमी साधनांच्या साह्याने खेळले जाणारे टिक्करबिल्ला, डबा ऐसपस, विटीदांडू, लपाछपी, जोडसाखळी असे प्रकार अशा डोकेबाज मुलांनीच शोधून काढलेले आहेत.

🖋 डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

“आपण अभ्यासात हुशार नाही!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!” विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाही..मी मठ्ठ आहे.. इत्यादी.

असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे हे आपण नीट समजवूून घेऊ.

“गोबल्स” नावाचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही.

लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे.

तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’

वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने २४०० वर्षापूर्वी म्हणाले, “माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे.

लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या गु्रपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या गु्रपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही.

मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा शिक्षक रुजू होतील तेव्हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने हुशार बनायला सुरुवात होतील.. त्यांना असं वाटणार नाही की मी विसरभोळे आहे.

संस्कार

संस्कार

लहान मुलं, तारुण्यात येणारी मुलं किंवा अगदीच सर्वच वयोगटातील माणसं यांच्यावर भले किंवा चांगले संस्कार होण्यासाठी एकूणच देशभरात अनेक प्रकारच्या गोष्टींचा, प्रयोगांचा सततचा मारा चहुबाजूंनी सुरू असलेला दिसतो. मुळात संस्कार म्हणजे काय? तर ज्या गोष्टी चांगल्या, मानवी मुल्य जपणाऱ्या असतात त्या. लहान मुलांवर संस्कार चांगले व्हावेत याचा ठेका जणू तमाम पालक, शिक्षक, नातेवाईक यांच्याकडेच दिलेला असतो. आणि ते मग आपापल्या परिनं गोड बोलून, समज देऊन, प्रसंगी मारझोड करून पोरांना संस्कार शिकवण्याचा आटापिटाही करत राहतात. अगदीच दमछाक होईपर्यंत. तरीसुद्धा पोरांना जे करायचं ते करतही राहतात. मला नेहमी प्रश्न पडतो, एकूणच देशातल्या प्रत्येक नागरीकावर त्यांच्या लहानपणापासून अनेक चांगले संस्कार शिकवले गेलेले असताना सुद्धा देशात वाईटपणा, भ्रष्टाचार, चोऱ्या, व्याभिचार, बलात्कार, खुन, भांडणं यासारख्या वाईट गोष्टी सुरूच आहेत किंवा त्या थांबायचं नाव घेत नाहीत. कारण, काय असावं? तर अगदी साधं उत्तर आहे. संस्कार ही देण्याची नव्हे, घेण्याची गोष्ट आहे. मग भले ते तुम्ही समोरच्या माणसाला कशाही प्रकारे शिकवण्याचा किंवा लादण्याचा प्रयोग करा. समोरचा माणूस त्याला पाहिजे तसंच तो जगणार असतो. माझा बहुतेकदा पालकांशी संपर्क येतो. एक पालक तोंडात तंबाखू टाकत म्हणाले,
आमचं पोरगं नको म्हटलं, तरीसुद्धा अमूक अमूक एखादी वाईट गोष्ट करतंच. हल्ली तर गुटखाही खायला लागलंय. सगळे भले-बुरे उपाय करून झालेत. तुम्ही सांगा काय करावं?
मी चिडून म्हणालो, जी गोष्ट तुम्ही स्वतः इतक्या आवडीने खाता, तीच गोष्ट तुमच्या मुलानं खाल्ली तर त्यात वाईट ते काय? मुळात पालक म्हणून तुम्ही स्वतः किती संस्कारक्षम आहात याचा विचार कधी केलायं काय? त्यामुळे त्याला जे करायचंय ते करू द्या. बिघडला तर बिघडू द्या. तो आणि त्याचं कर्म.
साधी गोष्ट आहे. नेहमी खरे बोलावे हा सुविचार, मुल्य आपण सगळेच शाळेय वयापासून शिकलेलो आहोत. तरीसुद्धा आपण उभ्या आयुष्यात कितीवेळा खरे बोलतो? असा प्रश्न स्वतःलाच एकदा विचार पहा. म्हणजे लक्षात येईल दुसऱ्यांना संस्काराची भाषा शिकवणं योग्ययं कि अयोग्य? जे संस्कार आपणच कधी घेतले नाहीत ते आपल्या मुलांना शिकवण्याचा आपल्याला काय अधिकार? आणि मुलांनी ते अंगीकारावेत याची अपेक्षा तरी कशी बाळगायची?
दिवसातून ४ वेळा तंबाखू खाणारा माणूस स्वतःच्या मुलांकडून र्निव्यसनी राहण्याची अपेक्षा कशी काय करू शकतो? आपण आपल्या तारुण्यात दिसेल त्या पोरींवर लाईनी मारायच्या, एखादी पोरगी पटावी म्हणून जीवाची घालमेल करून घ्यायची आणि कधीतरी आपण म्हातारे झाल्यावर आपल्या ऐन तारुण्यात आलेल्या पोरांनी मात्र तसलं काही न करता सज्जनपणे जगायचं ही भलतीच अपेक्षा नाही काय? पोरांनी लाईनी मारल्या तर त्याला वाईट म्हणायचं. मात्र आपण केलं तर रितीप्रमाणे म्हणायचं. हा दुजाभाव कशाला?
म्हणून मला वाटतं, पोरांना संस्कार वगैरे शिकवण्याच्या फंदात न पडता, पालक, शिक्षक म्हणून आपणच आधी निट, सरळमार्गी जगण्याचा प्रयत्न करूत. आपापल्या तत्वांवर ठामपणा ठेवूत. पोरांना आपल्याकडे बघून जेवढं चांगलं घेता येईल तेवढं ते घेतील. बाकी गोष्टींना पर्याय नाही. कारण, घराबाहेरील जगातून देखिल पोरं काहीतरी भलं- बुरं शिकणारचं असतात. आईबाप म्हणून आपण पोरांच्या किती किती गोष्टींवर बंधनं आणणार?
आता मी माझ्या घरातील गमंत सांगतो. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही पुस्तकं वाचण्याचा नाद आहे. आमच्या घरात हजारांहून जास्त पुस्तकं आहेत. छोटं ग्रंथालय आहे. आम्हाला १० वर्षाचं एक पोरंगयं. तर आम्ही त्याला पुस्तकं वगैरे वाच असं आजतागायत सांगितलेलं नाही. नि सांगणारही नाही. पण प्रत्येक महिण्याला शे – दोनशेची लहान मुलांची पुस्तकं आम्ही बाजारातून नित्यनियमाने आणतही असतो. जमेल तसं त्याच्या समोर बसुन वाचत असतो. आता वाढत्या वयानुसार पोराला समजलंच की, आईबाप जे वाचतात ते आपणही वाचू तर वाचेल की तो. त्याकरीता त्याच्यावर जबरदस्ती कशाला?
शेवटी महत्वाचं सांगतो, मुलं वाढवताना त्यांचे पालक (पालनपोषण करणारेच)व्हा. जन्मदाते व्हायला गेलात की, मग सगळा मामला बिघडतो. मला काय म्हणायंचय, ते कळलं असेलच तुम्हाला? आँ???

प्रगल्भता

प्रगल्भता म्हणजे काय?
· (what is MATURITY)
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.
· आणि शेवटी अती महत्वाचे
· प्रगल्भता म्हणजे : जेव्हा आपण अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.
· Be Happy with Nothing, You will be Happy with Everything

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे

1 तारे जमीन पर
2 एलिझाबेथ एकादशी
3 प्रकाश बाबा आमटे
4 टपाल
5 श्वास
6 कराटे किड
7 कुंग फ़ू पांडा
8 राजमाता जिजाऊ
9 रमाबाई भिमराव आंबेडकर
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
11 भाग मिल्खा भाग
12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय
14 होम
15 यलो
16 चिलर पार्टी
17 द किड
18 होम अलोन
19 तानी
20 सिंड्रेला
21 बेबीज डे आऊट
22 ज जंतरम म मंतरम
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
25 वनपुरुष
26 दहावी फ़
27 बभागो भूत आया
28 Two sollutions
29 twenty thousand leagues
30 under the sea
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया
33 शाळा
34 राजुचाचा
35 किंग अंकल
36 दोस्ती (हिंदी)
40 3 इडियटस
41 चल चले
42 चकोरी
43 चिंटू
44 चिंगी
45 I am Kalam
46 Park
47 graviti
48 jurasic world
49 सिंधूताई सपकाळ
50 castaway 51 भगतसिंग
52 चिमनी पाखरं
53 the berning train
54 Harry potter 55 mountain man
56 शिक्षणाच्या आईचा..
57 लोकमान्य
58 विटी दांडू
59 आक्टोबर स्काय
60 मासूम
61 क्रिश
62 एक डाव भुताचा,
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away – Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro – Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age – 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free
81 Inside out
82 Madagascar
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six,
92 rio
93 Karate kid
94 Home alone….
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi,
100 blue umbrella,
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug’s Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies

प्रश्नपत्रिका

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

“शब्दांचे अर्थ लिहा” म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

“समानार्थी, विरुद्धार्थी शब्द”,
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

“गाळलेल्या जागा भरा”,
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या “जोड्या जुळवा”,
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

“एका वाक्यातल्या उत्तरा”नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी…उत्तराची वाट बघत..

“संदर्भासहीत स्पष्टीकरण” लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

“कवितेच्या ओळी पुर्ण” करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

“निबंध लिहा”, किंवा “गोष्टं लिहा”,
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं “option” ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनीj आठवली…
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

SAVAY

दोन मुले दूरच्या प्रवासाला निघाली. एकाच्या आईने आपल्या मुलाला भाकरीची चव्वड बांधून दिली. तर दुसऱ्याच्या आईने भाकरी तयार करण्याचे सर्व साहित्य दिले. आईला मदत करता करता भाकरी तयार करण्याची कला तो शिकला होता.
दोन-तीन दिवस ज्याची तयार शिदोरी होती तो मजेत होता. पण काही दिवसच. पुढे दररोज भाकरी जास्त शिळी होत गेली. तसतसा त्याचा आनंदही कमी होत गेला. दुसरा मुलगा मात्र दररोज ताजी भाकरी करून खात होता. मजेत, आनंदात प्रवास करत होता. तयार भाकरी म्हणजे मुलासाठी संपत्ती कमावून ठेवणे आणि भाकरी तयार करता येणं म्हणजे शिक्षण होय.
संपत्ती गोळा करताना हा विचार अवश्य करा की आपल्या मुलांना आयतं काही देण्यापेक्षा, त्यांना ही शिकवण द्या की ती संपत्ती ते स्वतः कमवुन समाज आणि देशाच्या कार्यासाठी कसे उपयोगात आणू शकतील. ह्याने देश,समाज आणि आपल्या मुलांचाही विकास होईल.

(अ)समाधानी पालक

(अ)समाधानी पालक
काही माणसं ही त्यांच्या पालकपणाने फार गांजून गेलेली असतात. अशी काही माणसं आहेत. ते या स्वरूपाचे प्रश्न विचारतात –

मुलं कधी एकदा मोठी होणार?
कधी एकदा शहाणी होणार? कधी एकदा स्वतंत्र होणार? हे एवढे का भांडतात? किती हे प्रश्न? कधी सुटणार? कधी एकदा मुलांना त्यांचं स्वत:चं कळणार आणि कधी आपण सुटणार, असं त्यांना होऊन गेलेलं असतं.
मुलांचे हट्ट, भांडणं, अंगातली अतिरिक्त ऊर्जा, सततच्या मागण्या- काहीच सहन होत नाही. अशा पालकांना कदाचित मुलं म्हणजे ‘एक आदर्श चित्र’ असावं अशी अपेक्षा असते. असं कधी होतं का?
जसं आदर्श मूल हे भिंग घेऊन शोधावं लागेल तसंच आदर्श पालक हेदेखील शोधावेच लागतील. या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही, हेही आपल्याला माहीत नाही.
इतरांची मुलं थोडाच काळ भेटतात. तेव्हा ती चांगलीच वागतात. म्हणून आपलीही मुलं अशीच शहाणी असावीत, अशीच आदर्श असावीत, असं वाटत राहतं. अशा प्रकारे तुलना केल्याने कोणीच शहाणं होत नसतं किंवा परिस्थिती आपोआप सुधारत नसते.
समाधानी होणं हे आपल्याच हातात असतं. पालक असतानाच्या काळातला सर्वात सुंदर काळ कोणता? तर, आजचा क्षण.
मुलं वाढत असताना आता पुढे काय घडेल याचाच विचार करत राहिलो, तर त्या नात्यातली, त्या कामातली मजा कधी घेणार?
बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा.
शाळेतल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी मनापासून सोडवणं –
या अडचणी वाटून घेणं हा क्षणही किती महत्त्वाचा आहे! मूल किती ‘हुशारीने’ आणि ‘चलाखीने’ हट्ट करत आहे हासुद्धा निरीक्षणाचा भाग असायला हवा. टीन एजमधल्या मुलांबरोबर मोकळेपणाने गप्पा मारणं, हे तसं अवघड; पण जमायला हवं.
आनंदाचा काळ पुढे केव्हा तरी येईल या आशेवर आज त्रास सहन करत आहोत असे विचार काहीच कामाचे नाहीत.
त्यापेक्षा आज आणि आत्ता आनंदी राहाणं आपल्या हातात आहे…